विश्वास त्रिभुवन, अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ऑनलाईन अहमदनगर:- तालुक्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. जेऊर गावचे ग्रामदैवत देवी बायजामाता यात्रा उत्सवाला शेवटच्या दिवशी दंगली झाली. त्यात अनेक नागरिक जखमी झाले आहे. या यात्रोत्सवात दोन लहान मुलांच्या भांडणामुळे दोन गट एकमेकांमध्ये भिडले व तुफान दगडफेक झाली व तलवारी पण निघाल्या.
या घटनेप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस अधीक्षक राकेश ओला हे पथकासह घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी या ठिकाणी माहिती घेऊन कारवाईचे आदेश दिले.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, यात्रोत्सवाचा शेवटचा दिवस म्हणून महिला, लहान मुले व नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. रहाटगाडग्याजवळ मुलांमध्ये सायंकाळी आठच्या सुमारास शाब्दिक चकमक झाल्याची माहिती नागरिकांकडून मिळाली. यानंतर दोन्ही गटाकडून दगडफेक झाली. यात्रेतील खेळण्याची दुकाने तसेच यात्रेत जमलेल्या नागरिक, महिला यांच्यावर सुमारे अर्धा तास दगडफेक सुरू होती. अचानक दगड फेक सुरू झाल्याने यात्रेत सर्वत्र पळापळ सुरू झाली. यामध्ये खेळण्याचे दुकानदार असलेल्या महिला व लहान मुले जखमी झाले. तसेच काही ग्रामस्थांनाही दगड लागल्याने जखमी झाले आहेत. एकूण दहा जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.
यात्रेत झालेल्या दगडफेकीने अनेक महिला तसेच लहान मुले यात्रेतच अडकून पडले होते. अनेक लहान मुले पालकांपासून विभक्त झाल्याने लहान मुले व आई वडील धाय मोकलून रडत होते. ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने ध्वनिक्षेपकावरून शांतता राखण्याचे आवाहन करण्यात येत होते. परंतु परिस्थिती खूप भयानक व भितीदायक बनली होती. जेऊरगावात बाजारपेठेत दगडांचा मोठा खच पडला होता. दंगल प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. जेऊर गावामध्ये गेल्या काही दिवसांपासून जातीय तेढ निर्माण झाल्याचे चित्र दिसून येत आहे. गावात दंगल झाल्यानंतर मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. गावामध्ये तणावपूर्ण वातावरण तयार झालेले आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक घटनास्थळी: या दगड फेकीची माहिती कळताच जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला ठिकाणी रात्रीच्या सुमाराला पोहोचले. नेमकी माहिती घेतल्यानंतर त्यांनी जखमींना तत्काळ शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे.
या दगडफेक प्रकरणी पोलिसच फिर्यादी झाले असून पोना दीपक गांगर्डे यांनी दिलेल्या फिर्यादी वरून इद्रीस मुनीर शेख, मन्नू अलीम कुरेशी, अजीज रफिक शेख, हर्षद बागवान, साहिल बागवान, मुनीर खैरू शेख, शेख मुस्ताक, युनूस शेख, मुसा शेख, फइस रफिक शेख, अतुल उर्फ सोमनाथ सुखदेव तवले, सुनील दारकुंडे, गणेश दारकुंडे, दीपक शिंदे यांच्यासह इतर १०० ते १५० जण (सर्व रा. जेऊर बायजाबाई, ता.नगर) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील ९ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. तसेच इतर आरोपीचा शोध सुरु आहे.

