मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गडचिरोली:- बंधाऱ्यात पाेहण्याचे गेलेल्या पाच युवका पैकी चार युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना चामोर्शीजवळील चिचडोह बंधाऱ्यातून समोर आली आहे. त्यात बुडत असलेल्या मित्राला वाचवले; पण नंतर ते चौघेही बुडाले. 14 मे रोजी सर्वत्र मातृदिन साजरा होत असताना चामोर्शी शहरात ही दुर्दैवी घटना घडली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
प्रफुल्ल विठ्ठल येलुरे वय 20 वर्ष, महेश मधुकर घोंगडे वय 20 वर्ष, शुभम रूपचंद लांजेवार वय 24 वर्ष तिघेही रा. प्रभाग क्र. 4 आशा सदन टोली, चामोर्शी, मोनू त्रिलोक शर्मा 26 रा. गडचिरोली अशी मयतांची नावे आहेत. हर्षल धोडरे 22, रा. चामोर्शी याचा काळ आला होता पण वेळ आली नव्हती. नशीब बलवत्तर म्हणून तो बचावला.
रविवारी ते दुपारी एकत्रित आले. चामोर्शीजवळील एका हॉटेलात त्यांनी जेवण केले. त्यानंतर चिचडोह बंधाऱ्यात पाेहण्याचे ठरवले. पाचही जण पाण्यात उतरले. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने हर्षल बुडू लागला. त्याला वाचविण्यासाठी चौघेही धावले. घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली. बोट तसेच डोगा उपलब्ध नसल्याने दोरी बांधून पाण्यात उडी घेतली; पण कोणालाही वाचविण्यात यश आले नाही.
नातेवाईकांच्या आक्रोश….
या घटनेनंतर बंधाऱ्याजवळ नागरिकांनी तोबा गर्दी केली. चार तरुण मित्रांचे एका शेजारी मृतदेह ठेवले हाेते. हा प्रसंग हृदय पिळवटून टाकणारा होता. त्यानंतर चामोर्शी ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीवेळी कुटुंबीय व नातेवाईकांनी एकच आक्रोश केला. त्यामुळे उपस्थितांनाही गहिवरुन आले. संपूर्ण शहर शोकसागरात बुडाले होते. आमदार डॉ.देवराव होळी यांनी रुग्णालयात धाव घेऊन कुटुंबीयांना धीर देण्याचा प्रयत्न केला.