.✒️ आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी मोबाईल. न. 8888630841
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरात असलेल्या उपजिल्हा रुग्णालय हे नावालाच असून येथे मोठ्या प्रमाणात हलगर्जी कारभारामुळे हे रुग्णालय नेहमी चर्चेत राहते. अशाच हलगर्जी मुळे हिंगणघाट तालुक्यातील एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना समोर येतात संपूर्ण शहरात संताप व्यक्त करण्यात येत आहे.
हिंगणघाट तालुक्यातील एका महिलेला सर्पदंश झालेल्या महिलेवर हिंगणघाट येथील उपजिल्हा रुग्णालयात तातडीने उपचार न करता काही वेळाने उपस्थित असलेल्या डॉक्टरांनी सेवाग्रामला पाठविले. परंतु, वाटेतच त्या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यामुळे संबंधित डॉक्टरांवर कारवाई करून मृत सीमा मेश्राम यांच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई देण्याची मागणी सर्पमित्र प्रवीण कडू यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
प्राप्त माहितनुसार, पिंपळगाव (मा.) येथील किशोर मेश्राम यांच्या पत्नी सीमा मेश्राम या २३ मे रोजी घरकाम करत असताना त्यांना पायाला काहीतरी चावल्याचा भास झाला. त्याचवेळी पायाजवळून उंदीर गेला. चावा घेतलेल्या जागेवर खूप वेदना होत होती म्हणून त्यांना हिंगणघाट येथील उपजिल्हा रुग्णालयात आणले. येथील डॉक्टरांनी त्यांना औषध देऊन घरी परत पाठविले. त्या घरी परतल्यावर खूप अस्वस्थ वाटायला लागले आणि वेदनाही जास्त होऊन छातीत दाटल्यासारखे वाटायला लागले. म्हणून पुन्हा उपजिल्हा रुग्णालय गाठले. त्यांच्या पतीने डॉक्टरांना सर्व घटना सांगितली, पण डॉक्टरांनी लागलीच उपचार न करता काही वेळ थांबवून ठेवले. त्यानंतर सेवाग्रामच्या रुग्णालयात घेऊन जाण्याचा सल्ला दिला. त्यामुळे खासगी रुग्णवाहिकेने त्यांना सेवाग्रामला आणत असताना वाटेतच सीमा यांचा मृत्यू झाला.
हिंगणघाट येथील उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी तातडीने उपचार न केल्यामुळे सीमा मेश्राम यांना जीव गमवावा लागला. त्यामुळे संबंधित डॉक्टरवर कारवाई करून नुकसान भरपाई देण्याची मागणी सर्पमित्र प्रवीण कडू, संदीप बंडावार, किशोर मेश्राम, मनोज सलामे, हरिश्चंद्र मेश्राम यांनी तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्री, पालकमंत्री, आरोग्यमंत्री, मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा 9766445348 7385445348