रविंद्र भदर्गे, जालना उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन जालना:- वंचित बहुजन आघाडी आणि भारत राष्ट्र समिती या दोन पक्षात युती संदर्भात बोलणी सुरू असल्याची बातमी एका वर्तमानपत्रात छापून आली आहे. या बातमी मध्ये काहीही तथ्य नाही. पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकांसाठी तेलंगणा आणि महाराष्ट्रात संभाव्य युतीसाठी सध्या तरी कुठल्याही प्रकारची चर्चा सुरू नाही. तसेच भारत राष्ट्र समितीकडून तेलंगणा किंवा महाराष्ट्रात अद्याप कोणताही प्रस्ताव आलेला नाही.
तेलंगणा सरकारच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या उद्घाटनासाठी ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांना आमंत्रित करण्यात आले होते. त्यावेळी बाबासाहेबांचे नातू म्हणून बाळासाहेब आंबेडकर कार्यक्रमास उपस्थित होते. मात्र त्यात कुठलीही राजकीय चर्चा नव्हती झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा भारतातील सर्वात उंच पुतळा उभारल्याबद्दल आम्ही त्यांचे कौतुक करतो.
तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्वाखाली भारत राष्ट्र समिती सरकारने राज्यातील प्रत्येक क्षेत्रात अनु जाती, जमाती, ओबीसी आणि अल्पसंख्याकांच्या भल्यासाठी आणि कल्याणासाठी प्रशंसनीय कार्य केले आहे. संभाव्य राजकीय युतीसाठी भारत राष्ट्र समितीने पुढाकार घेतल्यास, वंचित बहुजन आघाडी त्याबद्दल निश्चितपणे विचार करेल; भारत राष्ट्र समितीचा मताचा वाटा, लोकप्रियता आणि वंचित बहुजन आघाडीच्या सामाजिक अजेंडाला चालना देण्यासाठी भारत राष्ट्र समिती काय करू शकते यासारखे अनेक घटक युती संदर्भात निर्णायक ठरतील.
तेलंगणातील निवडणुकीत त्यांना मदत करण्यासाठी आमच्याकडे मतदारांचे संख्याबळ आहे पण भारत राष्ट्र समिती हा वंचित बहुजन आघाडीसाठी महाराष्ट्रात किती उपयुक्त सहयोगी असू शकतो हा ही आमच्यासमोर प्रश्न आहे. मात्र भारत राष्ट्र समितीकडून युती संदर्भात प्रस्ताव आल्यास नक्कीच वंचित बहुजन आघाडी त्याचा विचार करेल. असे मत प्रदेश उपाध्यक्ष तथा प्रदेश प्रवक्ता वंचित बहुजन आघाडीचे सिद्धार्थ मोकळे यांनी व्यक्त केले.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348