हनिशा दुधे, चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन चंद्रपूर:- जिल्हातून एक मनहेलावणारी घटना समोर आली आहे. आंध्र प्रदेश येथून चंद्रपूरकडे येणाऱ्या धावत्या बसमधून उडी घेतल्याने एका विवाहित व्यक्तिचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी दि.30 ऑगस्ट ला दुपारी 1:30 वाजताच्या सुमारास गडचांदूर बसस्थानकापासून काही अंतरावर घडली. राकेश इंद्रजीत पटेल वय 25 वर्ष, रा. रिवा मध्य प्रदेश असे मयत तरुणाचे नाव आहे. विशेष म्हणजे, या बसमध्ये पत्नी व दोन नातेवाईकही बसले होते. आत्महत्येचे कारण कळू शकले नाही.
प्राप्त माहितीनुसार, चंद्रपूर जिल्हातील राजुरा – गोविंदपूर राष्ट्रीय महामार्गाच्या बांधकामावरील वाहनावर राकेश पटेल हा चालक म्हणून काम करत होता. एक वर्षापूर्वी त्याचा विवाह झाला होता. खेर्डी येथे तो आपल्या पत्नीसोबत भाड्याच्या घरात राहत होता. आंध्र प्रदेश महामंडळाच्या एपी 29 MP – Z 1543 क्रमांकाच्या बसमधून पत्नी व दोन नातेवाईका बरोबर गडचांदूरवरून चंद्रपूरकडे जात होता. दरम्यान, गडचांदूरच्या बसस्थानकापासून काही अंतरावर त्याने धावत्या बसमधून अचानक उडी मारली. त्यामुळे तो गंभीररित्या जख्मी झाला. चालक व प्रवाशांनी त्याला लगेच बस मधून ग्रामीण रुग्णालय येथे नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिस उपनिरीक्षक प्रमोद शिंदे पथकासह रुग्णालयात पोहोचले. पंचनामा करून आकस्मिक मृत्यूची नोंद केली. शवविच्छेदनानंतर मृतदेह मूळ गावी पाेहोचविण्याची व्यवस्था तसेच पैशाची मदत खिर्डीचे उपसरपंच दीपक खेकारे, अरविंद बावणे यांनी संबंधित कंत्राटदाराशी बोलून केली. आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. पुढील तपास गडचांदूर पोलिस करीत आहेत.

