पल्लवी मेश्राम नागपुर शहर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ऑनलाईन मुंबई/ नागपुर:- नागपूर शहर पाण्याखाली गेल्याची घटना ताजी असतानाच आता पुन्हा त्याचीच पुनरावृत्ती होण्याची शक्यता आहे. निर्माण झाली आहे. नागपूर शहराला पूर परिस्थितीपासून वाचविण्यासाठी बिल्डरने ऐतिहासिक सोनेगाव तलावावर अनधिकृतपणे चालविलेल्या बांधकामावर त्वरित स्थगिती देऊन संबंधित बिल्डरवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या महाराष्ट्र प्रदेश नेत्या उषाताई चौधरी यांनी केली आहे. यासंदर्भात चौधरी यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, नागपूर जिल्हाधिकारी व पालिका आयुक्तांना निवेदन दिले आहे.
नागपूरमधील अंबाझरी तलाव येथे मागील महिन्यात झालेल्या पावसामुळे संपूर्ण नागपूर शहर पाण्याखाली गेले होते. यावेळी हजारो नागपूर करांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले होते. ही घटना ताजी असतानाच शहराच्या मधोमध असलेल्या भोसले घराणे कालीन ऐतिहासिक असलेल्या सोनेगाव तलावावर देखील बांधकाम सुरु करण्यात आले असून या प्रकारामुळे नागपूरकरांना पुन्हा एकदा पूर परिस्थितीचा सामना करावा लागण्याची दाट शक्यता असल्याचे चौधरी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सर्व संबंधित प्रशासनाला आपल्या निवेदनाद्वारे निदर्शनात आणून दिले आहे.
सोनेगाव तलावाच्या परिसरात सोनेगाव वस्ती, बांते ले आऊट, रेसिडेन्सी पार्क तसेच मुळीक कॉम्प्लेक्स आदी दाटीवाटीची लोकसंख्या असलेला परिसर आहे. पावसाळ्यात या भागात दरवर्षी पाणी भरण्याच्या घटना घडत असतात त्यावर महानगरपालिका प्रशासनाने तोडगा काढणे आवश्यक असताना आता बिल्डरने सोनेगाव तलावाला मिळणाऱ्या नाल्याच्या तोंडावर मोठ्या प्रमाणावर बांधकामास सुरुवात केल्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड रोष पसरला असून सदर चाललेल्या बांधकामामुळे भविष्यात होणारा पुरस्थितीचा धोका टाळण्यासाठी सदर बांधकाम त्वरित थांबून संबंधित बिल्डरवर कारवाई करावी अशी मागणी चौधरी यांनी केली आहे.

