राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतीनिधी
मोबा. 8767747671
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन जिवती:- उन्हाळ्याची चाहुल लागताच जिवती तालुक्यातील अनेक गावात पाणी टंचाईने डोके वर काढले काही गावातील हातपंप कोरडे पडले असुन विहिरींनीही तळ गाठला आहे. त्यात शासनाच्या ‘जलजीवन मिशन’ या महत्वकांक्षी योजने अंतर्गत तालुक्यात १५९ कामे मंजुर असुन बहुतांश कामे युध्द पातळीवर सुरु आहेत मात्र बांधकामात महत्वाचा घटक असलेल्या रेती अभावी अनेक कामे रेंगाळली असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.
सध्या रेतीघाट बंद असल्याने बांधकामासाठी रेती वेळेवर मिळत नाही. ग्रामिण पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांकडून कामे विहित मुदतीत पुर्ण करण्याच्या कंत्राटदारांना सूचना दिल्या आहेत. कंत्राटदारांनी काही जुगाड करुन कामावर रेती आणली की, महसुल विभागाचा ससेमिरा कंत्राटदाराच्या मागे लागतो. कंत्राटदारांपुढे ईकडे आड तीकडे विहिर अशी परिस्थिति निर्माण झाली आहे.
अधिकाऱ्यांच्या गैरहजेरीत निकृष्ठ दर्जाची कामे.
ग्रामिण भागातील कामावर अधिकारी भेटी देत नसल्याचे कंत्राटदार मनमर्जीने कामे करत असल्याची बाब समोर आली आहे. जलजीवन मिशनच्या बांधकामात ओपीसी सिमेंट वापरणे बंधनकारक असतांना देखील जिवती तालुक्यातील कलगुडी येथील टाकीच्या बांधकामासाठी ओपीसी सिमेंट वापरले नसल्याचा व बांधकामावर पाणी न टाकल्याचा आरोप मनसेचे हकानी शेख तालुकाध्यक्ष जिवती यांनी केला आहे. याबाबत ग्रामिण पाणी पुरवठा उप विभागीय अंभियंता यांच्याकडे तोंडी माहिती दिली आहे. भविष्यात ‘जलजीवन मिशन’ च्या कामात हयगय झाल्यास मनसे त्याविरुध्द आक्रमक भूमिका घेईल असा ईशाराही त्यांनी दिला आहे.
‘जलजीवन मिशन’ च्या माध्यमातुन सामान्य माणसाची तहान भागेल असे वाटत होते मात्र तालुक्यातील कामाची कासवगती पाहुन जिवती तालुक्यातील जनतेच्या घशाची कोरड दुर होईल असे सध्यातरी वाटत नाही. कुठे विहिरीचे, टाकीचे तर काही ठिकाणी पाईपलाईनचे काम रखडल्याने योजना मार्च अखेरीस पुर्ण होणार नाही असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरु नये.