विश्वनाथ जांभूळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गडचिरोली:- जिल्हातून 3 मे 2024 ला संपूर्ण गडचिरोली जिल्हाला हादरविणारी घटना एटापल्ली तालुक्यातील बार्सेवाडा या गावात घडली येथे जादूटोण्याच्या संशयावरून एका महिलेसह दोघांना पेट्रोल टाकून जाळण्यात आलं. ही घटना 3 मे 2024 ला उघडकीस आली. या घटनेचा ग्राउंड रिपोर्ट जाणून घेण्यासाठी राज्याचे बुवाबाजी संघर्ष विभागाचे सहकार्यवाह विष्णुदास लोणारे यांच्यासह गडचिरोली जिल्हा शाखेची अंनिसची टीम दि.5 मे 2024 ला बारसेवाड्याला गेली.
ही घटना एटापल्ली पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असल्यामुळे तेथील पोलीस निरीक्षकाला भेटण्यासाठी आम्ही गेलो. गेल्यानंतर एटापल्लीचे अंनिस शाखा कार्याध्यक्ष प्रशांत तेलकुंटलवार यांनी सांगितलं की, “बार्शेवाडा सारखीच एक घटना जांभिया (गट्टा) येथे सुद्धा घडली आहे आणि मारहाण झालेला व्यक्ती एटापल्ली ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत आहे.” मामला काय आहे हे जाणून घेण्यासाठी आम्ही रुग्णालयात गेलो. पाहतो तर काय एक व्यक्ती खाटेवर निपचित पडलेला आहे. पाहून मन सुन्न झालं, जीभ अवाक झाली, मन हेलावून गेलं. असेही नराधम गावात असतात आणि आपल्याच सगे सोयऱ्याचे हाल एवढे वाईट करून सोडतात याची प्रचिती आली.
या घटनेच्या मुळाशी जाऊन घटना जाणून घेण्याच्या उद्देशाने विचारलं असता पिडीतासह त्याच्या मोठ्या मुलाने अंनिस वाल्यांजवळ घडलेला प्रकार कथन केला
तो असा:- पीडिताच्या घराशेजारी राहणारा एक व्यक्ती कॅन्सर ग्रस्त होता आणि तो नंतर मेला (कॅन्सर झालेल्या माणूस जगत नाही हे सर्वांना माहित आहे). आता त्याला नेण्यासाठी तिरडी तयार केली, तिरडीवर ठेवलं. आणि पिडीताच्या घरासमोरून स्मशानाकडे जाताना म्हणे ते प्रेत खांदा देणाऱ्यांना ढकलत ढकलत पीडिताच्या अंगणासमोर नेलं आणि तिथे जाऊन थांबलं. झालं. लोकांना संशय आला की, याच माणसानी जादूटोणा केल्यामुळे हा मरण पावला. (हे प्रेताला म्हणजे मेलेल्या माणसाला कसं समजलं माहित नाही) बरे, दुसरी गोष्ट अशी की हा पिडीत व्यक्ती पुजारीपणा करत नव्हता, फुकफाक करत नव्हता, कोणाला गंडे-दोरे-तावीज- मंतरलेले पाणी- भंडारा- अंगारा वगैरे देत नव्हता. मग आता हे जादूटोण्याच्या संशयावरून मुद्दाम केलेलं कृत्य नसावं का? खांदा देणारे व्यक्ती चांगले झोकुन असतात, पिऊन तुल असतात. खांदा देणाऱ्यापैकी एखाद्या व्यक्तीचा पिडीतासोबत कधीतरी भांडण झालं असावं, वाद-विवाद झाला असावा किंवा आणखी काही दुसऱ्या गोष्टी घडल्या असाव्यात आणि म्हणून त्याचा बदला घेण्यासाठी हे कृत्य केलं असावं अशी शंका येत नाही का? पिडिताची दोन्ही मुलं बऱ्यापैकी शिकलेली आहेत आणि मोठा मुलगा लॉयड लोहखनिज कंपनीमध्ये नोकरीला आहे अशावेळी त्यांची घरची आर्थिक परिस्थिती थोडी थोडी सुधारत आहे. आमची ही प्रगती या लोकांना पहावत नव्हती आणि ते (गावातील लोकं) आमच्याशी जळत होते. असंही तो मुलगा म्हणत होता. गावातील काही लोकं आम्हाला गावात येण्याला सुद्धा मज्जाव केलेला आहे आणि आम्हाला मारण्याची धमकी दिली आहे असेही तो मुलगा सांगत होता.
मित्रहो, रात्री ८-९च्या सुमारास गावातील काही गैर कायद्याची मंडळी एकत्र येऊन व संगणमत करून तावा-तावाने घराकडच्या दिशेने येताना मुलाला दिसली हे पाहून मुलाने वडिलाला झोपेतून जागे केले. प्रकरणाचे गांभीर्य मुलाच्या लक्षात आले. आपल्याला हे लोकं आता जिवंत मारल्याशिवाय राहणार नाही असे समजून मुलाने तेथून जंगलाच्या दिशेने पळ काढला व कसाबसा आपला जीव वाचवला. परंतु वडील मात्र सापडला. त्याला घरातून ओढत नेऊन समाज मंदिराच्या मांडवात बांधून प्रथम लाथा बुक्क्यानी मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता त्याच्याजवळच शेकोटी पेटवून लोखंडी सब्बल गरम केली व शरीरभर गुप्ताअंगासहित त्या सब्बलीने त्वचा जळेपर्यंत डागण्या दिल्या व जिवे मारण्याचा प्रयत्न केला. काही वेळानी मुलगा घरी परतला पाहतो तर काय त्याच्या वडिलाला मरण यातना होत असल्याचे दृश्य त्याला दिसले. नंतर पोलिसांची मदत घेऊन त्याने वडिलांना दवाखान्यात भरती केले.
मित्रहो केवढे कौर्य!
मित्रहो, माडिया समाजामध्ये एक संस्कृती आहे ती अशी की (कोणाला माहित असेल किंवा नसेल) मृत व्यक्तीला स्मशानात नेल्यानंतर त्याला पुरण्या अगोदर तो मृत व्यक्ती आपल्या नातेवाईकांना भेटतो. म्हणजे काय करतो. त्या मृत व्यक्तीची काही नातेवाईक मौतीला आलेली असतात. स्मशानात ती इकडे तिकडे बसलेली असतात किंवा उभी असतात. तर प्रेत त्यांना जाऊन भेटतो. म्हणजे काय करतो? खांदा देणारी माणसं तिरडी उचलतात मृत व्यक्तीचा भाऊ समजा मौतीला आला असेल तर त्याच्याजवळ जाऊन दोन-चार सेकंद थांबतात पुन्हा गड्ड्याजवळ येतात तिथे दोन-चार सेकंद थांबून दुसऱ्या नातेवाईकाकडे जातात त्याच्याजवळ दोन- चार सेकंद थांबून पुन्हा गड्ड्याजवळ येतात असं काही वेळ चालतं त्याच्यानंतर त्या प्रेताला पुरतात. आता मला हे सांगा खरोखरच त्या प्रेताला कळत असेल का, की हा माझा भाऊ आहे, हा माझा काका आहे किंवा हा माझा मामा आहे म्हणून. खांदा देणारी माणसंच त्या प्रेताला नातेवाईकाकडे नेत असतील की नाही? खरे तर ही खांदा देणारी माणसं खूप दारू पिऊन असतात, अडखळत असतात. जसं त्या ६० वर्षाच्या वृद्धाला जादूखोर ठरवून बेदम मारहाण केली,गरम सब्बलीने त्वचा जळेपर्यंत शरीरभर चटके दिले. मग इथे सुद्धा त्या लोकांना शंका यायला नको का, की हे नातेवाईक सुद्धा जादूखोर आहेत म्हणून? म्हणजे ही लोकं आपल्या सोयीने अर्थ लावतात असं नाही का वाटत?