मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हातील समुद्रपूर पोलीस स्टेशन विविध कारणांनी यापूर्वी वादग्रस्त ठरत आले आहे. परत एकदा समुद्रपूर पोलीस स्टेशन चर्चेत आले आहे. तांबे चोरीच्या प्रकरणात समुद्रपूर पोलिसांनी आर्थिक व्यवहार केल्याचा ठपका ठेवत 6 पोलिस कर्मचारी यांना निलंबित करण्याची कारवाई करण्यात आल्याने संपूर्ण जिल्हातील पोलीस विभागात एकच खळबळ उडाली आहे. समुद्रपूर येथील ठाणेदारपेक्षा पोलीस शिपाईच अधिक कारभारी व शिरजोर झाल्याची चर्चा रंगली आहे.
एका आठवड्यापूर्वी चोरीचा माल असलेले एक चार चाकी वाहन पोलिसांनी जप्त केले होते. हे जप्त केलेले वाहन नंतर एका पोलीस कर्मचाऱ्याने सोडून दिले होते. या प्रकरणाची माहिती वर्धा जिल्हा पोलीस अधीक्षक नुरुल हसन मिळाली. त्यांनी लगेच चौकशी करीत दोन पोलीस कर्मचाऱ्यांना मुख्यालयी येण्याची कारवाई केली.
मागील काही दिवसांपासून समुद्रपूर परिसरात तांब्याच्या तारेची चोरी करून ती विकणारी टोळी सक्रिय आहे. या चोरांना पकडण्यात पोलिसांना मोठे यश आले होते. या चोराकडून अनेक चोरीच्या घटनेच्या उलघडा होण्याची अपेक्षा होती. चोरीचे वाहन हाती लागल्याने कारवाई अपेक्षित होती. मात्र काही पोलीस कर्मचाऱ्यांनी ते वाहन पोलीस स्टेशन परिसरात लावले आणि मग परस्पर आर्थिक व्यवहार करून पोलिसी खिस्से गरम झाल्यावर ते वाहन सोडून दिले आणि कुठलीही कारवाई केलीच नाही.
हे वाहन जप्त करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याची सुट्टी असल्याने तो निघून गेला. प्रकरण गुन्हे अन्वेषण शाखेकडे सोपविण्यात आले होते. मात्र त्यांनी पुढील तपास न करता चालक व वाहन सोडून दिले. तसेच पोलीस ठाण्याच्या डायरीवर किंवा अन्य स्वरूपात चोरीच्या वाहनबाबत कुठलीच नोंद केली नाही. ही गंभीर बाब ठरली. त्याची दखल घेत पोलीस अधीक्षक हसन यांनी कारवाईचा बडगा उगारला. प्रमोद थूल, समीर कुरेशी, प्रमोद जाधव, सचिन शेंडे, सचिन भालशंकर, वैभव चरडे या सहा पोलीस शिपायांना निलंबित करण्यात आले आहे.
या धडक कारवाईने वर्धा पोलीस यंत्रणेत चांगलीच खळबळ उडाली आहे. या कारवाईपूर्वी दोन शिपायांना प्रथम पोलीस मुख्यालयाशी संलग्न करण्यात आल्याची माहिती आहे. समुद्रपूर पोलीस स्टेशन मधील डीबी पथकाने या परिसरात अवैध दारू वाहून नेणाऱ्या गाड्या, चोरीच्या रेतीचे टिप्पर पकडण्याच्या अनेक कारवाया केल्या. मात्र त्या प्रकरणात कारवाई केलीच नसल्याची गावात चर्चा होते. दहेगाव, वाघेडा, शेडगाव चौकात वाहनांची धरपकड झाली मात्र कारवाई उमटली नसल्याचे म्हटल्या जाते. ठाणेदार कारवाई करतात पण विविध बीट जमादार मात्र आपापल्या हद्दीत अवैध प्रकरणाकडे हेतूपुरस्सर दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप गावकरी करतात. आता तब्बल 6 शिपायांवर कारवाई झाल्याने पोलीस दलात खळबळ माजली आहे.