आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- राज्य शासनामार्फत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 1 जुलैपासून लागू केली आहे. या योजनेची प्रभावी व सुलभ अंमलबजावणीसाठी राज्य शासनाने योजनेची व्याप्ती वाढवली असून, यासाठी 12 जुलैला नवीन शासन निर्णय जारी केला आहे. त्यानुसार यशस्वी पात्र लाभार्थीची नोंद झाल्यानंतर नोंदणी करणाऱ्या घटकांना 50 रुपये प्रोत्साहन भत्ता देण्याची तरतूद करण्यात आली आहे.
राज्य शासनाने 12 जुलैला जारी केलेल्या नवीन शासन निर्णयानुसार, पात्र महिलेचे अर्ज भरण्यासाठी नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका व अंगणवाडी सेविका, एनयूएलएम यांचे समूह संघटक (सीआरपी), मदत कक्ष प्रमुख, सिटी मिशन मॅनेजर, आशा सेविका, सेत सुविधा केंद्र, अंगणवाडी पर्यवेक्षिका, ग्रामसेवक व आपले सरकार सेवा केंद्र यांना शासनाने प्राधिकृत केले आहे. त्यांनी नोंदणी केलेल्या अर्जांपैकी ज्या महिला लाभार्थीची अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यावर योजनेसाठी पात्र ठरतील. त्यांच्या संख्येप्रमाणे प्रती पात्र लाभार्थी याप्रमाणे 50 रुपये प्रोत्साहन भत्ता दिला जाणार आहे.
वर्धा जिल्ह्यात दि.14 जुलै पर्यंत एकूण 26 हजार 547 महिलांनी अर्ज केले आहेत. 12 हजार 938 महिलांनी ऑनलाइन तर 13 हजार 609 महिलांनी ऑफलाइन अर्ज केले आहेत. यामध्ये वर्धा तालुक्यातील 4 हजार 891, सेलू तालुक्यातील 2 हजार 721, देवळी तालुक्यातील 2 हजार 204, समुद्रपूर तालुक्यातील 2 हजार 71, हिंगणघाट तालुक्यातील 1 हजार 951, आर्वी तालुक्यातील 4 हजार 209, आष्टी तालुक्यातील 1 हजार 846, कारंजा तालुक्यातील 1 हजार 198 व शहरी भागातील 5 हजार 456 महिलांनी नोंदणी केली आहे.