…… विश्वनाथ जांभुळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी क्र. 9421856931
एटापल्ली, दि. १३ फेब्रुवारी :
दि. ९ फेब्रुवारीपासून एटापल्ली तालुक्यातील सर्व पत्रकार बांधवांनी तालुक्यातील प्रमुख रस्त्यांच्या नूतनीकरणाच्या रास्त मागणीसाठी साखळी उपोषण सुरू केले होते. मात्र अनेक दिवस उलटूनही शासन व प्रशासनाकडून कोणतीही ठोस दखल घेण्यात आली नाही. अखेर प्रशासनाच्या या सातत्यपूर्ण दुर्लक्षाच्या निषेधार्थ दि. १३ फेब्रुवारीपासून आमरण उपोषणास सुरुवात करण्यात आली आहे.
एटापल्ली तालुका “स्टील हब” म्हणून राज्याचे मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांनी घोषित केलेला असताना, तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री स्वतः मुख्यमंत्री असतानाही पत्रकारांना रस्त्यासारख्या मूलभूत प्रश्नासाठी उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागत आहे, ही अत्यंत दुर्दैवी व लाजिरवाणी बाब असल्याची भावना व्यक्त होत आहे.
तालुक्यातील एटापल्ली–देवडा–गडचिरोली, एटापल्ली–जारावंडी व एटापल्ली–हेडरी–गट्टा हे प्रमुख मार्ग सध्या अत्यंत खड्डेमय व धोकादायक झाले असून, दररोज अपघाताची भीती निर्माण झाली आहे. स्थानिक नागरिक, विद्यार्थी, रुग्णवाहिका सेवा तसेच शासकीय यंत्रणांनाही मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
पत्रकारांनी वारंवार निवेदन देऊनही कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने अखेर आमरण उपोषणाचा निर्णय घेण्यात आला. “विकासाच्या घोषणा केवळ कागदावरच राहणार का? रस्त्यांसाठी जीव धोक्यात घालणाऱ्या जनतेचा आवाज कोण ऐकणार? पत्रकार रस्त्यावर उतरले तरीही शासन झोपेतच का?” असे संतप्त सवाल उपस्थित केले जात आहेत.

