सौ. हनिशा दुधे, बल्लारपूर तालुका प्रतिनिधी
चंद्रपूर:- चंद्रपूर येथून काँग्रेस साठी एक खळबळजनक बातमी समोर येत आहे. चंद्रपूर जिल्हात एक गट काँग्रेस मधून बाहेर पडण्याचा मार्गावर असल्याची सुत्रा कडून माहिती प्राप्त झाली. तशे चित्र तिरंगा यात्रेच्या निमित्ताने काढण्यात आलेल्या रॅलीत दिसून आले.
चंद्रपुरात काल स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. त्यानिमित्ताने शहरात भारतीय जनता पक्षाच्या वतीने तिरंगा यात्रेच्या यात्रा काढण्यात आली होती. त्यात काँग्रेसचा पुगलिया गट आणि भाजप एकत्र आल्याचे दिसून आले. त्यामुळे काँग्रेस फुटण्याच्या स्थितीत आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळालेली आहे.
भाजप नेते आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते चंद्रपूर शहरातील गांधी चौकात 1500 फूट तिरंगा रॅलीचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी माजी खासदार आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते नरेश पुगलिया यांच्या पुढाकाराने ही तिरंगा रॅली आयोजित करण्यात आली होती. रॅलीच्या निमित्ताने काँग्रेस-भाजपचे दोन दिग्गज ध्रुव एकत्र आल्याने राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या गेल्या आहेत. आगामी चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीच्या दृष्टीने पुगलिया-मुनगंटीवार यांची जवळीक काँग्रेस साठी धोक्याची घंटा ठरू शकते.
माजी खासदार नरेश पुगलिया हे विदर्भातील काँग्रेसचं मोठं प्रस्थ असून ते लोकसभा, राज्यसभा आणि विधानसभा या तिन्ही सदनाचे सदस्य राहिले आहे. दिल्ली हायकमांड सोबत अतिशय जवळचे संबंध असल्याने राज्यातील काँग्रेस नेते नेहमी त्यांना घाबरून असतात. मात्र गेल्या काही वर्षात प्रदेश काँग्रेस कडून पध्दतशीरपणे जिल्ह्यातील पुगलिया यांच्या विरोधकांना महत्व देऊन पुगलिया यांना एकटं पाडण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र पुगलिया यांनी देखील वडेट्टीवार-धानोरकर यांच्या कुठल्याच कार्यक्रमात न जाता स्वतःची समांतर काँग्रेस जिवंत ठेवली आहे. चंद्रपूर, बल्लारपूर, गडचांदूर आणि राजुरा शहरात त्यांना नेता मानणारा काँग्रेसचा एक मोठा वर्ग आहे. याशिवाय चंद्रपूर, गडचिरोली आणि यवतमाळ जिल्ह्यात देखील त्यांना मानणारा मोठा कार्यकर्ता वर्ग आहे.