✍️लेखिका:- सरिता सातारडे, रा. नागपूर साहित्यिक व विचारवंत
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन विशेष लेख:- भारतीय संविधान हे भारतीय जनतेला समर्पित केलेले संविधान आहे. या संविधानाद्वारे भारतीय जनतेला काही मूलभूत अधिकार दिले आहेत. तसेच भारतीय लोकांमध्ये धर्म, वंश, लिंग, जन्मस्थानावर भेदभाव केल्या जाणार नाही याची ग्वाही ही हे संविधान देते. विविधता अनेक प्रकारांनी लोकांमध्ये असली तरी लोकांना एकसूत्रात बांधण्याचे कार्य हे संविधान करते.
आज देश स्वतंत्र होऊन ७० वर्षे झालेत भारतीय संविधानाला अभिप्रेत असलेला देश एव्हाना घडायला हवा होता.संविधान निर्माते डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ‘इंडिया म्हणजेच भारत’ असे स्पष्टपणे प्रतिपादन केले आहे. तरीही ही घटनात्मक मान्यता नाकारून धर्माधिष्ठित हिंदूराष्ट्र बनविण्याचा प्रपंच करण्यासाठी धार्मिक कट्टरतावाद आज आपल्या देशात वाढलेला आपण बघतो. ३० जानेवारी महात्मा गांधीचा स्मृतिदिन. कट्टरवादी गोडसे ने याच दिवशी गांधींना संपविले. आज अनेक गोडसे तयार होतांना दिसत दिसत आहेत. इतका धार्मिक कट्टरवाद कसा निर्माण होतो? प्रसारमाध्यमांतून काय बिंबवले जात आहे लोकांच्या मनामनावर? हा धार्मिक कट्टरवाद?
जेव्हा राजकारणामध्ये धर्माचा अंतर्भाव होतो तेव्हा धार्मिक कट्टरतावादाचा उदय होत असतो. आपण बघतो धर्माच्या नावाखाली कुंभमेळा किंवा इतरही धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन बाकायदा सरकार करते. हा पैसा जनतेचा असतो जो विविध टॅक्स च्या स्वरुपात जनता चुकवित असते.
एकीकडे मुलांच्या शिक्षणासाठी सरकारकडे पैसा नसतो(जे देशाचे भवितव्य आहे). असे वाटते की गरीब मुलांनी शिकूच नये यासाठी पध्दतशीर योजना सरकार आखत आहे की काय?
टिव्ही वर ही सतत हिंदू मुस्लिम ही बहस दाखवून जनतेची मने कलुषित करण्याची कामे केली जातात.
नागपूर मध्ये मागील 3/4 महिन्यांपासून आंबेडकरवादी महिलाचे आंदोलन सुरू आहे. डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचे सांस्कृतिक भवन इथे कोरोना काळात उध्वस्त करण्यात आले असून आजही प्रस्थापित महाराष्ट्र शासनातील मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री या गोष्टीची साधी दखलही घेत नाही आहेत. अनेक आवेदनांना केराची टोपली दाखविण्यात येत आहे. उन्हातान्हात, पावसात इथल्या महिला अंबाझरी मार्गावरील परिसरात आंदोलन करित आहे आणि हे सरकार डाॅ. बाबासाहेब आंबेडकर या नावालाच इतके घाबरते आणि महिलांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करण्यातच पराक्रम मानते.
दिल्ली येथे जंतरमंतर वर आॅलंपिक विजेत्या साक्षी मलिक, विनेश फोगाट, संगिता, बजरंग पुनिया आणि इतरही पहिलवान त्यांच्यासोबत आणि इतरही खेळाडूंवर झालेल्या यौन शोषणा विरूध्द बीजेपी चा मंत्री ब्रिजभूषण शरण यांच्या विरूध्द आंदोलन सुरू होते. पास्को अंतर्गत केस ही दाखल झालीय या मंत्रीमहोदयावर. तरीही याला अटक करणे तर दूरच उलट 28 तारखेला जेव्हा आमच्या प्रधानसेवकजी ने राजदंड सेंगाल स्थापित करित नवीन संसदभवनाचे उद्घाटन केले तेव्हा सफेद कपडे घालून हे महाशय ‘सत्यमेव जयते’ च्या आवरणाखाली पूर्ण भारतीय जनतेला चिडवत तिथे उपस्थित होते.नवीन संसदेचे उद्घाटन होत असतांना जंतरमंतर वर प्रोटेस्ट करित असलेल्या या महिला पहलवानांचा आत्मसन्मान परत एकदा कुचलण्यात आला त्यांना डिटेन करण्यात आले. महिला पहलवान सरकारच्या या धोरणाने इतक्या आहत झाल्यात की अत्यंत परिश्रमपूर्वक मिळालेली मेडल्स गंगेमध्ये प्रवाहित करण्यास उद्युक्त झाल्यात.. देशाची राष्ट्रपती एक महिला असूनही आम्हाला साथ दिली नाही.. देशाचा चमकोगिरी करणारा प्रधानमंत्री आमचा नाही ही विषण्णता त्या बोलून दाखवितात.
आजच्या न्यूजमध्ये हे ही ऐकण्यात आले की ब्रिजभूषण शरण सिंग ला पाठिंबा देण्यासाठी 5 जून ला या देशातील साधूसंतांच्या नेतृत्वाखाली एक मोर्चा ही काढण्यात येणार आहे.
गुजरात मधील बीलकिस बानो प्रकरण ही आपल्या सर्वांना माहितच आहे..
बिल्किस बानोवर बलात्कार करणाऱ्यांना, तिच्या कोवळ्या मूलीला मारून टाकणाऱ्या अपराध्यांना ते ‘संस्कारी ब्राह्मण’ आहेत.. जेलमध्ये त्यांची वागणूक चांगली होती म्हणून त्यांना सोडून देण्यात आले ऐवढेच नाही तर हारतुरे घालून त्यांचे जंगी स्वागतही करण्यात आले.
भारतीय जनता इतकी स्थितप्रज्ञ कशी?
बलात्कार करणारे संस्कारी कसे? हा प्रश्न ही जनतेला पडू नये..?
अरेरे…
काय हे देशाचे दुर्दैव…
देश आज कुठल्या भयंकराच्या आवरणात अडकला आहे याचा भारतीय जनतेने जरूर विचार करावा..
अशा मनुस्मृती चा पुरस्कार करणाऱ्या विचार सरणी विरूध्द ताराबाई शिंदे 1882 ला स्त्री-पुरुष तुलना हे पुस्तक लिहून विषमतावादी पुरूष प्रवृत्ती विरूध्द ताशेरे ओढतात. भारतीय महिलांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी आता.. आता अशा प्रवृत्ती विरूध्द प्रहार करायचा की गुलाम बनून जगण्यातच धन्यता मानायची..
दोनच मार्ग दिसत आहेत तुमच्याकडे..
एक मनुस्मृती.. ज्याचा रस्ता हे प्रस्थापित सरकार तूम्हाला दाखवत आहे. आणि दुसरे आहे भारतीय संविधान जो रस्ता संविधान निर्माते डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी दाखविला आणि त्याद्वारेच आज पर्यंतच्या जीवनात तूम्ही उंच भरारी घेऊ शकल्यात. जे सरकार सध्या सत्तेवर आहे त्याचा एजंडा काय आहे हे नव्याने सांगण्याची गरज नाही. ‘अच्छे दिन’ च्या नावाखाली फसलेल्या जनतेलाही तिची चूक कळाली आहे. हे कुठेतरी थांबायला हवे असे प्रत्येकाला वाटते.
संवैधानिक भारतात सर्वत्र लोकं न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधूता याची ओढ असलेले आहेत. म्हणूनच भारतीय संविधानाला मानणाऱ्या प्रत्येक व्यक्तीमध्ये बंधूतेचे नाते निर्माण होणे जरूरी आहे.
‘बुध्द आणि त्यांचा धम्म’ मध्ये डाॅ बाबासाहेब आंबेडकर धर्म आणि धम्म मधील फरक व्यवस्थित समजावून सांगतात. देवावर श्रद्धा, आत्म्याच्या अस्तित्वासंबंधी विश्वास, ईश्वरपूजा, चुकणाऱ्या आत्म्याची सुधारणा, प्रार्थनाविधी व यज्ञ-याग इत्यादींनी देवाला प्रसन्न करणे म्हणजे धर्म हे सर्व आशय धर्म या शब्दाने व्यक्त होतात. याऊलट धम्म हा सामाजिक आहे. मूलतः व तत्त्वतः तो सामाजिक आहे. धम्म म्हणजे सदाचार. म्हणजेच जीवनाच्या सर्व श्रेत्रात माणसा-माणसातील व्यवहार उचित असणे. ज्या वेळी दोन माणसे कोणत्याही संबंधाने एकत्र येतात तेव्हा त्यांना आवडो अगर न आवडो धम्म हा पाहिजेच. त्यापासून सुटका नाही. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर समाज धम्माशिवाय असूच शकत नाही.
धर्माचे प्रयोजन जगत्प्रारंभाचे स्पष्टीकरण आणि धम्माचे प्रयोजन जगाची पुनर्रचना हे आहे.
मित्रांनो,
आता धम्माची खरी आवश्यकता आहे. जगाला धम्मा द्वारे अजून सुंदर बनवायचे आहे की धार्मिक कट्टरतावादाचा बुरखा पांघरूण वावरणाऱ्या लोकांना आपण साथ द्यायची हे सूज्ञ लोकांनी आता समजून घ्यावी.
भारतातील मनुस्मृति वर आधारित समाज व्यवस्थेमूळे लाखो लोकांचे जीवन अंधकारमय झाले होते. कशी होती इथली समाजव्यवस्था? अन्न, पाणी, निवारा या जीवन जगण्यासाठी आवश्यक असणाऱ्या मूलभूत गरजांना पारखे झालेले लोकं पशुसम जीवन इथे जगत होती. प्रकाशाच्या प्रतिबिंबाला पारख्या झालेल्या लोकांच्या जीवनात सूर्य उगवला तो भारतीय संविधानामूळेच. असे असतांना संविधान विरोधी कायदे संविधानाचा वापर करूनच या देशात बनत असतील तर भारतीय जनतेच्या मनात असंतोष उफाळून येईलच.
आज संविधान संस्कृति चा उदय करण्याची गरज निर्माण झाली आहे. लोकं आपले हक्क आणि कर्तव्य समजून घेत आहेत असे असतांना भारतीय सरकारने मनमानी संपवून जनतेच्या भावना ओळखाव्यात. कारण हे लोकांनी निवडून दिलेले सरकार आहे. जनतेमध्ये सौहार्दाचे वातावरण तयार करणे ही शासनाची जिम्मेदारी आहे.
आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिराती करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348


जाणुन बुजुन सायकोलाॅजिकली डोळ्यांसमोर सतत विषमता व जातीचे प्रदर्शन करुन ब्रेनला हॅमरींग करत प्रत्येक व्यक्तीला भ्रम निर्माण करुन बधिर सुन्न करुन लाचार केले जात आहे. तुसता जात धर्मच नाही भ्रष्ट व्यवहार, मनुष्य तस्करी, जमिन फसवणुक, हेल्थ संस्थांकडुन फसवणुक, कागदपत्रांची अफरातफर, सर्वत्रच सावळा गोंधळ माजविला आहे. आणि विकास काय तर करोडो रुपयांचा पुल गंगेच्या स्वाधिन. तिहेरी लोकल अपघात सिग्नल घोटाळा, हे काय मेट्रो पळवणार.. मुबंईच बुडवायचे पाण्यात. यांना उठवा त्या खुर्च्यांवरुन अगोदर