नासिर खान, नवीमुंबई प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नवीमुंबई:- येथील एक खळबळजनक घटना समोर आली आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या घणसोली विभाग कार्यालय अंतर्गत असणाऱ्या खदानीत बुडून एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आयुष यादव असे मृत पावलेल्या 14 वर्षीय मुलाचे नाव आहे.
घणसोली घरोंदा परिसरात राहणारा आयुष हा त्याचा भाऊ आणि त्याचा मित्र असे तिघेजण घणसोली परिसरातील श्री. साईबाबा मंदिर खदानीतील एका पाण्याच्या डबक्यात पोहण्यासाठी आले होते. दुपारी दीड ते दोन वाजण्याच्या सुमारास पावसात भिजण्याचा आनंद घेतल्यानंतर हे तिघेजण खदानीतील डबक्यात पोहोण्यासाठी उतरले होते. पाण्यात उतरलेल्या आयुषला खदानीच्या पाण्यातील खोलीचा अंदाज न आल्याने आणि या खदानीतील गाळात अडकून बाहेर पडता न आल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला अशी माहिती मिळत आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या कोपरखैरणे अग्निशमक केंद्राला याची नागरिकांनी माहिती दिल्यानंतर अग्निशमन केंद्र अधिकारी गजेंद्र सुसवीरकर, लीडिंग फायरमन विवेक कलगुटकर, मातेरे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाण्यात बुडालेल्या आयुष्याला बाहेर काढले.
रबाळे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आयुषला ताब्यात घेऊन पालिकेच्या वाशी येथील रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. रात्री उशिरा रबाळे पोलीस ठाण्यामध्ये सदर घटनेची नोंद करण्यात आली आहे. याचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

