हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बल्लारपूर:- चंद्रपूर जिल्हातील बल्लारपूर वनपरिक्षेत्रातील कळमना उपविभागातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे भुकेने व्याकूळ झालेल्या वाघाच्या दोन बछड्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, एक बछडा गंभीर आहे. ही घटना गुरुवारी समोर आली. त्यामुळे वाघ बचाव मोहिमेला मोठी चपराक बसली आहे. त्यात एका गंभीर असलेल्या बछड्यावर वनविभागाकडून उपचार सुरू आहेत.
कळमना परिक्षेत्रातील कक्ष क्रमांक ५७२ मध्ये गुरुवारी वनविभागाचे काही कर्मचारी गस्तीवर होते. या कर्मचाऱ्यांना वाघाचा एक अपंग बछडा दिसला. कर्मचाऱ्यांनी तत्काळ या बछड्याची सुटका करून प्राथमिक उपचारासाठी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या वन्यजीव उपचार केंद्रात पाठवले. त्यानंतर त्या ठिकाणी अधिक शोध घेतला असता काही अंतरावर वाघाचे दोन बछडे मृतावस्थेत आढळून आले.
या तिन्ही बछड्यांची आई वाघीण मागील काही दिवसांपासून बेपत्ता असल्याने भुकेने व्याकूळ झाल्याने या वाघाच्या दोन बछड्यांचा मृत्यू झाला असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. वनविभागाने ताब्यात घेतलेल्या तिसऱ्या बछड्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याच्यावर वनविभागाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत उपचार सुरू आहेत.
बछड्यांची माहिती मिळताच वनाधिकाऱ्यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. त्यानंतर दोन्ही बछड्यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण समोर येणार आहे. शवविच्छेदन करणाऱ्या टीममध्ये डॉ. कुंदन पोडचेलवार आणि डॉ. दिलीप जांभुळे यांचा समावेश होता. या घटनेच्या अनुषंगाने वनविभागाचे अधिकारी पुढील तपास करीत आहेत.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

