✒️ महेंद्र कदम, संगमनेर तालुका प्रतिनिधी
बोटा: – संगमनेर तालुक्यातील पठार भागातील केळेवाडी परिसरातील पाझर तलावाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे ओढे, नाले ओसंडून वाहू लागल्याने केळेवाडी गावच्या पाझर तलाव परिसरापासून वाहणार्या ओढ्याने रौद्ररूप धारण केल्याने केळेवाडी अकलापूर दरम्यान रस्त्यावरील छोट्या उंचीच्या पुलावरून या पुराचे पाणी ओसडून वाहू लागले. त्यामुळे विद्यार्थी, नागरिक, प्रवासी यांची दोन्ही बाजूने वाहतूक कोंडी झाली, तर काही विद्यार्थी, नागरिक जीवावर उदार होऊन प्रवास करत असल्याचे चित्र समोर आले आहे.
परतीच्या पावसाने पठार भागातील बोटा परिसरातील गावांमध्ये धुव्वाँधार पावसाने हजेरी लावली. यात अनेक ठिकाणचे ओढे, नाले तुडुंब भरून वाहू लागल्याने विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत.
केळेवाडी ते येलखोपवाडी दरम्यान असलेल्या ओढ्याच्या पुलाची उंची कमी आहे. दरवर्षी पावसाळ्यात पूर आला की प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. प्रवासी रात्रभर दोन्ही बाजूंनी अडकतात.या पुलाची उंची वाढवावी.