मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत उबाठा, काँग्रेस आणि इतर पक्षातील पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेश संपन्न
फेसबुकवरून महापूर हाताळता येत नाही त्यासाठी प्रत्यक्ष फिल्डवर उतराव लागतं- घरी बसून उत्तम काम करण्याबाबतच्या वक्तव्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रत्युत्तर
नितीन शिंदे ठाणे जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ऑनलाईन मुंबई:- उबाठा गटाचे माजी नगरसेवक विष्णू सावंत आणि माजी नगरसेविका विनया सावंत यांच्यासह विविध पक्षातील पदाधिकारी आणि असंख्य कार्यकर्त्यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये प्रवेश केला. या सगळ्यांचे पक्षात स्वागत करून त्यांना त्यांच्या भावी सामाजिक आणि राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी त्यांच्यासह सह्याद्री विकास संस्थेच्या अध्यक्ष सरला सावंत, काँग्रेसचे उपजिल्हाप्रमुख विजय गोमा पाटील, दिंडोशी विधानसभा संघटक सीताराम जाधव, उबाठा गटाच्या महिला उपविभाग संघटक सौ. पूनम वैद्य यांनीही आज शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला.
यावेळी बोलताना विष्णू सावंत यांनी शिंदे साहेब जेव्हा 40 आमदाराना सोबत घेऊन सुरतला गेल्याचे कळले तेव्हा प्रचंड वाईट वाटले होते असे सांगितले. मात्र इथे परत आल्यावर त्यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यावर ज्या पद्धतीने सर्वसामान्य लोकांच्या हिताचे निर्णय घेऊन लोकोपयोगी कामे केली त्यामुळे माझे मत बदलले. मुंबईत पहिला पाऊस झाला तेव्हा सगळ्यात आधी मिलन सबवे मध्ये उतरून त्यांनी पाहणी केली, इर्शाळवाडी येथे जेव्हा दुर्घटना घडली तेव्हा सगळ्यात आधी तिथे पोहचुन लोकांना मदत कार्यात झोकून देत काम करणारे मुख्यमंत्री होते. चांगल्या कामाला चांगलं म्हणायचा स्वभाव असल्याने त्यांचे कौतुक वाटायचे, आमच्या विभागातील कोकणी माणसाच्या भूखंडाचा प्रश्न तेच सकारात्मकरित्या सोडवतील आणि सर्वसामान्य मराठी माणसाला न्याय देतील याची खात्री पटल्यानेच आज शिवसेनेमध्ये प्रवेश करत असल्याचे मत सावंत यांनी व्यक्त केले.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी नगरसेविका विनया सावंत यांच्या शिवसेना प्रवेशामुळे उबाठा गटातून शिवसेनेमध्ये येणाऱ्या नगरसेवकांची संख्या 36 एवढी झाली आहे. येणाऱ्या काळात ही संख्या अजून वाढेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
दिंडोशी विधानसभा मतदारसंघातून हे सर्व पदाधिकारी आज पक्षात येत आहेत याचे समाधान आहे. गेली अडीच वर्षे राज्यातील सर्व विकासकामे मग ती मेट्रो असो की आरे कारशेड असो वैयक्तिक अहंकारापोटी ठप्प झाले होते. त्यामुळे राज्यात सत्तेत येताच ही सर्व कामे वेगाने पूर्ण करण्यासाठी त्याना गती दिल्याचे सांगितले. लोकांच्या हितापेक्षा स्वतःच हित महत्वाचे वाटू लागले त्यामुळे अशा गोष्टी घडत असल्याचे सांगितले. शिवप्रेमी संस्थेच्या भूखंडाचे विष्णू सावंत यांनी सुरू केलेले काम नक्की पूर्णत्वास जाईल तसेच त्यांच्या प्रभागातील विकासकामे पूर्ण करण्यासाठी नक्की निधी मिळेल असे सांगितले.
सध्या काही जण घरी बसून देखील मुख्यमंत्रीपद सक्षमपणे भूषवता येते असे मत व्यक्त करत आहेत, मात्र घरी बसून साधं नगरसेवक पद देखील भूषवता येत नाही ही वस्तुस्थिती आहे. फेसबुकवरून महापूर हाताळता येत नाही त्यासाठी फिल्डवर उतरावेच लागते. यापूर्वी मी हाताळलेला कोकणातील महापूर असो, किंवा महालक्ष्मी एक्स्प्रेस पाण्यात अडकली असताना केलेली मदत असो, किंवा कोरोना काळात प्रत्यक्ष लोकांमध्ये जाऊन केलेले काम असो ते फिल्डवर उरतून केल्यामुळेच करणे शक्य झाल्याचे शिंदे यांनी सांगितले. आपण फिल्डवर गेलो की अधिकारी सजग होतात, यंत्रणा अलर्ट होते, मदत लवकर मिळते त्यामुळे अनेक जीव वाचवणे शक्य होत असल्याचे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री कुठे आहेत असे विचारणाऱ्याना मला एवढच सांगायचे आहे की मुख्यमंत्री म्हणून नव्हे तर सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणूनच मी आजही कार्यरत आहे आणि यापुढेही राहणार असल्याचे मत यावेळी व्यक्त केले.
काल गोरेगाव येथे लागलेल्या आगीमुळे बाधित झालेल्या एसआरए इमारतीत राहणाऱ्या लोकांनी माझी वर्षावर भेट घेतली असून त्यांचे बहुतांश प्रश्न मार्गी लावण्याचे निर्देश आपण दिले असल्याने ते समाधानाने आपल्या घरी गेल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले. त्यामुळे सध्या काही काम नसलेले लोक दिवस रात्र फक्त आरोप करणाऱ्यांना आरोप करू द्या आम्ही आरोपाना कामातून प्रत्युत्तर देऊ असे मत यावेळी बोलताना व्यक्त केले.
यावेळी शिवसेनेचे खासदार गजानन कीर्तिकर, उत्तर पश्चिम लोकसभा संपर्कप्रमुख उदय सावंत, शिवसेना प्रवक्त्या सौ. शीतल म्हात्रे, विभागप्रमुख गणेश शिंदे, सौ. कला शिंदे हेदेखील उपस्थित होते.

