श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड:- जिल्ह्यात सोमवारी झालेल्या जाळपोळ आणि दगडफेकीच्या घटना पूर्वनियोजित असल्याचे पुन्हा स्पष्ट झाले आहे. जाळपोळ आणि तोडफोडीचे साहित्य दोन वाहनांतून आल्याची धक्कादायक माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. दोन्ही हिंसक घटनामधील दाखल एकूण 20 गुन्ह्यांत पोलिसांनी आतापर्यंत 134 संशयितांना अटक केली आहे. तर, सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून या घटनांतील सहभागी असणाऱ्या आणखी 150 वर संशयितांची ओळख पोलिसांनी पटविली आहे.
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या उपोषणाच्या समर्थनार्थ जागोजागी आंदोलने सुरू होती. शनिवार 28 ऑक्टोबरपासून हिंसक घटना घडू लागल्या. यात सोमवारी 30 ऑक्टोबर रोजी जिल्ह्यात नेत्यांच्या घरांना, कार्यालयांना तसेच इतर प्रतिष्ठानांना आग लावणे व दगडफेक केल्याप्रकरणी जिल्ह्यात 15 गुन्हे नोंद झाले आहेत. तर, याआधी अशाच घटनांप्रकरणी 5 गुन्हे नोंद झाले आहेत.

