राज शिर्के, मुंबई शहर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांना 2019 मध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री पद दिले नसते तर ते सरकार कधीच टिकले नसते, असा खळबळजनक दावा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी बुधवारी केला. पवार यांनी संघटनेत काम केले त्याचे प्रत्यंतर अनेकवेळा पहायला मिळाले आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री केले ते चूक की बरोबर हे काळाच्या ओघात सिद्ध झाले आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये विविध मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याविषयी माहिती देण्याकरिता बोलविलेल्या पत्रकार परिषदेत तटकरे यांनी जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या टीकेचा समाचार घेतला
अजित पवार यांना २०१९ मध्ये उपमुख्यमंत्री केले ही चूक झाली, असे वक्तव्य आव्हाड यांनी केले होते. त्यावर उत्तर देताना तटकरे म्हणाले की, २०१९ मध्ये अजित पवार यांना उपमुख्यमंत्री केले नसते तर ते सरकारच टिकले नसते. त्यावेळी गुप्त मतदान झाले असते तर तेव्हाच ते सरकार पडले असते, असा गौप्यस्फोटही त्यांनी केला. अजित पवार हे विरोधी पक्षनेते झाले ते बहुसंख्य आमदारांनी मागणी केल्यामुळे. त्याहीपुढे त्यांचे ऐकले नाही म्हणूनच ५३ पैकी ४३ आमदार आज अजित पवारांच्या पाठीशी उभे आहेत. त्यामुळे त्यांचे सामर्थ्य संघटनेत, विधिमंडळात काय आहे हे झारखंडचे एक आमदार, नागालँडचे सात आमदारांच्या पाठिंब्यावरूनच त्यांची ताकद आता स्पष्ट झाली आहे, असेही तटकरे म्हणाले.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे परभणी आणि धाराशिव या दोन जिल्ह्यांत दोन मेळावे घेण्यात येणार असून ७ जानेवारीला मुंबई प्रदेश काँग्रेसचा तर, १८ जानेवारीला राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रदेशचा मेळावा मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याला राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार व सर्व मंत्री उपस्थित राहणार आहेत असेही ते म्हणाले. १४ जानेवारी रोजी महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांत एकाच वेळी महायुतीचे मेळावे होणार असून यावेळी तालुका, जिल्हा पदाधिकारी, त्यामध्ये महिला, युवक व सेलचे पदाधिकारी म्हणजे किमान १२०० ते १५०० प्रमुख कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. राज्यात आगामी येणाऱ्या लोकसभा निवडणुकीसंदर्भात प्रमुख नेते मार्गदर्शन या मेळाव्यात करतील. याची रुपरेषा ठरवण्यासाठी ५ जानेवारीला समन्वय समिती आणि घटक मित्र पक्षाची बैठक मंत्री दादाजी भुसे यांच्या बंगल्यावर घेणार आहोत, अशीही माहिती तटकरे यांनी दिली.
आव्हाड हे बेदखल झालेले नेते: निराशेच्या गर्तेत सापडलेली माणसे आणि आयुष्यभर खोटे बोलून स्वतःचे राजकीय महत्त्व वाढवलेली माणसं यापेक्षा काय बोलणार आणि त्यांच्याकडून काय अपेक्षा ठेवणार असा टोलाही तटकरे यांनी आव्हाड यांना लगावला. आव्हाड हे बेदखल झालेले नेते आहेत, असे ते म्हणाले.
रोहित पवार यांच्या अनुपस्थितीवरून टोला: राहुल गांधी यांच्या पदयात्रेनंतर आपणही पदयात्रा महाराष्ट्रात काढावी आणि महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे नेते आहोत असे दाखवावे, या कारणासाठी काढलेल्या संघर्ष यात्रेला राहुल गांधी यांच्या पदयात्रेपेक्षा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला असल्यामुळे कदाचित ते विश्रांतीला गेले असावेत म्हणून त्यांनी पक्षाच्या शिबिराला जाणे टाळले असेल असा खोचक टोला तटकरे यांनी रोहित पवार यांना लगावला.