अनिल कडू विशेष प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दलीत आदिवासी, फासे पारधी, कोलाम समाजाच्या भूमिहीन बेघर कुटुंबीयांनी शासनाच्या भूखंडावर निवासी प्रयोजन साठी अतिक्रमण केलेले आहे. हे निवासी अतिक्रमणे नियमानुकल करून, आहे त्याच ठिकाणी पक्के घरकुल बांधून देण्याच्या मागणीसाठी उपविभागीय कार्यालय समोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.
हिंगणघाट तालुक्यातील कोल्ही येथील फासे पारधी, काचनगाव येथील कोलाम, नांदगाव येथील दलीत आदिवासी वडार समाजाचे निवासी अतिक्रमण आहे. केंद्र सरकारने सर्वासाठी घरे २०२२ योजना जाहीर केली. याची अंमलबजावणी करण्यासाठी राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारने २२ आगष्ट २०२२ रोजी शासन निर्णय निर्गमित केले. त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी होणे अपेक्षित असताना दलीत आदिवासी, फासे पारधी, कोलाम समाजाच्या निवासी अतिक्रमण धारकांना हककाच्या घरकुल पासून वंचित राहावे लागत आहे. याकडे शासनाचे लक्ष वेधण्याकरिता दलीत पँथरचे केंद्रीय कार्याध्यक्ष जगदिश इंगळे आणि बिगर सातबारा शेतकरी संघटना चे नेते सूर्या शस्त्रकार यांच्या नेतृत्वात एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.
या एक दिवसीय धरणे आंदोलनात नांदगाव, काचणगाव, बेंदुरणी, कोल्ही सहित अन्य गावातील अतिक्रमण धारकांनी मोठ्या संख्येने भाग घेतला. आणि या अतिक्रमण धारकाचे प्रस्ताव शक्ती प्रदत्त समिती कडे सादर करण्याचे निर्देश देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली. यावर त्वरीत निर्णय न घेतल्यास आंदोलन बेमुदत करण्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला.