हनिशा दुधे, चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन चंद्रपूर:- जिल्हातून एक मन हेलावणारी घटना समोर आली आहे. महाशिवरात्री निमित्त वरोरा तालुक्यातील भटाळी येथे महादेवाच्या दर्शना करिता गेलेले काही तरुण परतीच्या प्रवासात वर्धा नदीत आंघोळ करण्यासाठी गेले असता त्यातील 3 तरुण नदीत बुडाल्याची दुर्दैवी घटना काल 8 मार्चला दुपारी 4 वाजताच्या सुमारास घडली. ही घटना समोर येताच संपूर्ण जिल्हात एकच खळबळ माजली आहे.
काल रात्रीच्या सुमारास या तीन तरुणाचा शोध नदी पात्रात घेतला असता ते आढळले नव्हते. आज सकाळी परत 9.30 वाजता शोधमोहीम राबविण्यात आली. चंद्रपूर येथून रेस्क्यू टीम बोलाविण्यात आली. त्यांनी बोटीच्या साहाय्याने नदी पात्रात तरुणांचा शोध घेतला असता सकाळी 11.45 वाजताच्या सुमारास संकेत पुंडलिक नगराळे वय 27 वर्ष याचा मृतदेह आढळून आला. तर काही वेळातच अनिरुद्ध सतिश चाफले वय 22 वर्ष या तरुणाचा मृतदेह आढळून आला. दोघेही शहरातील विठ्ठलवाडी येथील रहिवासी आहेत. त्यांच्या सह नदीत बुडालेला हर्षल अतिश चाफले वय 17 वर्ष हा तरुण मात्र अद्याप मिळून आला नाही. रेस्क्यू पथकाकडून या तरुणाचा नदी पात्रात युद्ध पातळीवर शोध मोहीम राबविली जात आहे.
विठ्ठलवाडी परिसरातील 10 ते 11 तरुण महाशिवरात्री निमित्त भटाळी येथे भरणाऱ्या जत्रेत गेले होते. तेथून परतांना त्यांना मार्गातील वर्धा नदीवर आंघोळ करण्याचा मोहअनावर झाला आणि हे तरुण वर्धा नदीत आंघोळी करिता गेले. नदीपात्रात उतरल्यानंतर त्यांना पाण्याच्या पातळीचा अंदाज न आल्याने त्यांच्या पैकी काही तरुण खोल पाण्यात गेले व नदीत बुडाले. आज रेस्क्यू पथकाला पाचारण करून सकाळी 9.30 वाजता पासून नदी पात्रात या तरुणांचा शोध घेण्यात आला. रेस्क्यू पथकाच्या अथक प्रयत्नानंतर सकाळी 11.45 वाजता संकेत नागराळे व अनिरुद्ध चाफले या तरुणांचे मृतदेह आढळून आले. तर हर्षल चाफले या तरुणाचा अद्यापही शोध लागलेला नाही.
तहसीलदार निखिल धुळधर व ठाणेदार अनिल बेहरानी यांनी घटनास्थळाला भेट देऊन परिस्थितीचा वेळोवेळी आढावा घेतला. पोलिस पथक अद्यापही घटनास्थळी तळ ठोकून आहे. सायंकाळी उशिरापर्यंत तिसऱ्या तरुणाचा शोध न लागल्याने शोध मोहीम थांबविण्यात आली आहे. उद्या परत या तरुणाचा शोध घेतला जाणार आहे.