अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट दि.९ एप्रिल:- तालुक्यात काल आलेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याची माहिती समोर आली आहे. हिंगणघाट शहरातच नव्हे तर तालुक्यातही काल सोमवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते, मध्यरात्री २.१० मिनिटांनी शहरातसुध्दा विजांचे गडगडाटासह जोरदार वादळी पावसाला सुरुवात झाली. परंतु अवघ्या अर्ध्या तासात वातावरण शांत झाले, शहरातही रात्री तुरळक प्रमाणात गारपिट झाली. या दरम्यान काही काळाकरिता विद्युत पुरवठा खंडित झाला होता. आज मंगळवारीसुध्दा दिवसभर ढगाळ वातावरण होते.
हिंगणघाट तालुक्यातील घाटसावली, दारोडा, बांबर्डा, अल्लीपुर पारडी, पिंपळगाव (हाते), कुटकी, सावंगी (हेटी) तसेच मौजा गाडेगाव (रीठ) येथे वादळी वाऱ्यासह पाऊस व गारपीट झाले असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. पारडी येथे शेती पिकांचे नुकसान झाल्याची माहिती मिळाली तर पिंपळगाव (हाते) या तलाठी साझ्यात गारपिटीच्या तडाख्याने शेतकऱ्यांच्या भाजीपाला पिकांचे नुकसान झाले आहे तर गाडेगाव (रीठ) येथे टरबूज शेतीचे नुकसान झाल्याची तक्रार येथून प्राप्त झाली आहे.
जोरदार पावसामुळे आर्वी (छोटी) येथील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अल्लिपुर भागात मोठ्या प्रमाणात गारपिट झाली असून शेतकऱ्यांचे तीळ, कोहळी, टरबुज व अन्य पिकांचे नुकसान झाले असल्याने शेतकऱ्यांनी तात्काळ पंचनामे करून शासनाकडे मदतीची मागणी केली आहे. अधिक माहिती घेतली असता या गारपिटीसह झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे कोणते नुकसान झाले याबाबत महसूल व कृषी यंत्रणेकडे माहिती नाही.