हनिशा दुधे, चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन चंद्रपूर:- सध्या देशात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यात सर्वच राजकीय पक्षांनी आपल्या उमेदवाराची यादी जाहीर केली आहे. तर काही ठिकाणी युती आणि आघाडी मध्ये मतभेद दिसून येत आहे. या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जोरदार तयारी सुरू केली आहे. काल चंद्रपूर येथे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आपली पाचवी यादी जाहीर केली आहे. या पाचव्या यादीत 10 उमेदवारांची नावे घोषित करण्यात आली आहे. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषद मध्ये प्रकाश आंबेडकर घेतली.
2024 च्या लोकसभा निवडणुकीत राज्यात मराठा समाजाच्या मतदारांचाही मोठा प्रमाणात प्रभाव पडणार असून त्याच संदर्भात वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी महत्वाचं वक्तव्य केलं आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत मराठा समाजाच्या मतांच्या संदर्भात बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, मराठा समाजातील गरीब मराठा समाज हा मनोज जरांगे पाटील यांना स्वतःचा मार्गदर्शक मानत आहे. 30 टक्के मतदार हा जरांगे पाटील म्हणतील, तसे मतदान करणार आहे असे म्हणत मनोज जरांगे पाटील यांच्या मागे किती टक्के मराठा उमेदवार आहे याचा आकडाच थेट प्रकाश आंबेडकर यांनी सांगितला.
मोदींवर जोरदार हल्लाबोल..
वंचित अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली. राजकीय पक्ष हे भारताच्या एकतेचे प्रतीक आहेत, असे मी मानतो. ही प्रतिके नरेंद्र मोदी संपवायला निघाले आहेत. मोदींना देश तोडायचा असल्याचा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला.
पंतप्रधान मोदी म्हणतात की, पुढच्या 5 वर्षांत मीच सत्तेवर येणार, काँग्रेसने 2029 च्या निवडणुकीची तयारी करावी. दुसऱ्या बाजूस सत्तेत नसणारी काँग्रेस देश फोडणार असाही प्रचार चालू आहे. देशाचा एकोपा जो आहे यातील सर्वांत महत्वाचा घटक म्हणजे राजकीय पक्ष असल्याचेही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारतीय जनता पक्षाचे सरकार असे संबोधित नाहीत. कोणतीही योजना आली की, ती सरकारची आहे असे न मांडता ती नरेंद्र मोदींची आहे अशी मांडली जाते. ज्यांनी काँग्रेस संपवायची गोष्ट केली, त्यांनी स्वतःहून भारतीय जनता पक्ष संपवण्याचा मार्ग अवलंबला आहे, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.
भाजप पक्ष संपला..!
आरएसएसशी आमचे मतभेद कायम आहेत. पण मी मोहन भागवतांना विचारतो की, मागील अडीच वर्षांत आपण किती वेळा नरेंद्र मोदी यांच्याकडे वेळ मागितला किंवा त्यांना तुम्ही सांगितलं आहे की, आपण भेटलं पाहिजे, असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी मोहन भागवतांना विचारला. या अडीच वर्षांत नरेंद्र मोदी आणि त्यांचा जो कार्यकर्ता आहे, त्यांनी स्वतःलाच प्रश्न विचारला पाहिजे की, नरेंद्र मोदी हे जर मोहन भागवतांना भेटत नसतील, तर त्यांनी मोदींचा प्रचार का करावा. कारण, प्रचार करताना भाजपचा उमेदवार आहे असे सांगितले जात नाही, तर मोदींचा उमेदवार आहे असे सांगितले जाते.
त्यामुळे भाजप संपला आहे अशी परिस्थिती असल्याचे आंबेडकर यांनी नमूद केले.