संतोष मेश्राम, राजुरा तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा :- आदिम जमातीच्या सर्वांगीण विकासासाठी प्राधान्य क्रमाने निधी वितरित होण्याच्या दृष्टीने शासनाने ज्या प्रकारे जिल्हा वार्षिक आदिवासी घटक कार्यक्रम अंतर्गत पारधी विकास योजना अमलात आणली त्याच धर्तीवर आदिम कोलाम समाजातील नागरिकांच्या विकासासाठी जिल्हास्तरावर शासनाने विकास योजना मंजूर करून स्वतंत्र लेखाशीर्ष उपलब्ध करून निधी उपलब्ध करून द्यावा आणि विकासापासून वंचित असलेल्या आदिम कोलाम जमातीला इतर समाज घटकासोबत जोडण्यासाठी तातडीची कार्यवाही करावी अशी मागणी लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांनी आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित, सचिव, आयुक्त यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा, कोरपना, जिवती तालुक्यातील माणिकगड पहाडावर वास्तव्यास असलेले आदिवासी कोलाम जमातीचे ६९ गुडे आहेत. सदर कोलाम गुडे अतिदुर्गम भागात असल्याने कोलाम समाज अजूनही मुलभूत सोई-सुविधा पासून वंचित आहेत. या ६९ गावे/ गुडे/पाड्यांमध्ये १८९० कुटुंब अनेक वर्षांपासून वास्तव्य करीत आहेत. हे कोलाम बांधव डोंगराळ भागात राहत असून ते मुख्यतः नैसर्गिक शेतीवर अवलंबून आहेत. या समाजातील नागरिकांच्या विकासासाठी अजून पर्यंत स्वतंत्र लेखाशीर्ष उपलब्ध नसल्याने येथील नागरिक शासकीय सोई-सुविधा पासून वंचित आहेत. त्यामुळे सदर गंभीर बाब लक्षात घेऊन आ. सुभाष धोटे यांनी आदिवासी विकास विभागाकडे ही मागणी केली आहे.