पल्लवी मेश्राम, उपसंपादक नागपूर
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या लाखों अनुयायांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पवित्र दीक्षाभूमीवर समता तसेच सामाजिक क्रांतीची मुहूर्तमेढ रोवली आणि त्यामुळेच संपूर्ण समाज प्रगतीपथावर अग्रेसर होऊ शकला. ही दीक्षाभूमी अवघ्या विश्वासाठी त्याग, शांती आणि मानवतेची प्रेरणा देणारी आहे. लाखों करोडो आंबेडकरी नागरिकांची उर्जास्थान असलेल्या दीक्षाभूमी आज वेगळ्या कारणाने चर्चेत आहे. सध्या दीक्षाभूमी संस्थेत सर्वकाही आलबेल नसल्याचे चित्र दिसून येत आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या हयातीत कुठल्याही संस्थेत घरातील सदस्यांना विश्वस्त म्हणून घेतले नव्हते. किंबहुना ते या विरोधातच होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणानंतर त्याच्या संस्थेत त्यांनी नियुक्त केलेले विश्वस्त होते. हळूहळू काळ लोटत गेल्यानंतर संस्थेत पदावरून भांडणे सुरू झाली.
त्यांनी स्थापन केलेल्या रिपब्लिकन पक्ष (RPI), भारतीय बौद्ध महासभा असो की डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेल्या शिक्षण संसंस्थेत ही भांडणे सुरू झाली आणि आताही सुरू आहेत. नागपूरच्या दीक्षाभूमी समितीतही पदावरून भांडणे सुरू आहेत. माजी राज्यपाल रा.सु. गवई यांच्या निधनानंतर त्यांच्या रिक्त जागेवर सुपुत्र डॉ. राजेंद्र गवई यांना घेण्यात आले. सदानंद फुलझेले यांच्या जागेवर त्यांचे सुपुत्र सुधीर फुलझेले यांना घेतले. नंतर अंतर्गत वादानंतर त्यांनी राजीनामा दिल्याचं कळते. समिती ही सद्यस्थितीत दीक्षाभूमीवर कुठले प्रकल्प राबविते हे माहीत नाही. माध्यमांना त्यांनी यासंदर्भात कधीही माहिती दिलेली नाही. धम्मचक्र प्रवर्तन दिनापूर्वी समितीचे विश्वस्त माध्यमांना कार्यक्रमासंदर्भात माहिती सांगतात. त्याव्यतिरिक्त कुठलीही माहिती सांगितली जात नाही.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं व्हिजन हे मोठं होत. त्यांना दैववाद मान्य नव्हता. त्यांच्या विचारांना अनुसरून समिती ही हल्ली कुठलेही कार्य करीत नाही असे चित्र दिसून येते आहे. सद्यस्थितीत तिथे अंतर्गत वाद सुरू आहे. सध्या दीक्षाभूमी समितीचे अध्यक्ष म्हणून भदंत आर्य सुरई ससाई नागार्जुन आहेत. त्यांचं इतर सदस्य ऐकत नाही. भन्तेजीच्या विरोधात हे सदस्य आहेत. समितीत घराणेशाही आणि अंतर्गतवाद यामुळे खरंच दीक्षाभूमीचं योग्य संचालन होते का? हा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे आंबेडकरी समाजात याविषयी रोष आहे. यापूर्वी समितीच्या विरोधातही आंदोलने झाली आहेत. सुधीर फुलझेले हे आता डॉ. आंबेडकर मॅनेजमेंट कॉलेज सांभाळतात, अशी माहिती आहे. ते अंतर्गत राजकारणाचे बळी ठरले अस बोललं जातंय.