अनिल कडू, हिंगणघाट विशेष प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 2 ऑक्टोबर 2024 रोजी विदर्भ विकास आघाडीचे वतीने शेतकरी बेरोजगार महापंचायत आयोजित करण्यात आलेली होती. या महापंचायतीला वर्धा लोकसभा खासदार अमर काळे, पदवीधर विधान परिषद सदस्य अभिजीत वंजारी, शिक्षक विधान परिषद सदस्य आमदार सुधाकर अडबाले या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत तथा राजरत्न आंबेडकर यांचे अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील जागरूक नागरिक यांचे उपस्थितीत परिसरातील शेतकरी व बेरोजगार तरुण-तरुणींच्या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
यावेळी शेतकरी बेरोजगार महापंचायत मध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी कोरडवाहू शेतीला सिंचनाची बारमाही सोय आणि शेतमालाला c+50 या सूत्राप्रमाणे हमीभावात खरेदी व्हावी. शिक्षित तरुण-तरुणींना रोजगार मिळावा असे ठराव पारित करण्यात आले होते. शासनाने रुग्णालयाच्या मोठ- मोठया इमारती बांधायचा खर्च केला, पण डॉक्टर, नर्स, तंत्रज्ञ, उपकरणे व औषधांच्या सुविधा पुरवल्या नाहीत. सर्वसामान्य जनतेला आरोग्याच्या पूर्ण सुविधा पुरविण्याचे नियोजन व्हावे.
गोर, गरीब ग्रामीण जनतेच्या शिक्षणाची अवस्था फार वाईट आहे. स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषद व पंचायत समिती, ग्राम पंचायत स्तरावरील शाळांच्या ईमारतींची अवस्था अतिशय बिकट आहे. या शाळा चालू राहतील ,त्यातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण कसे देता येईल त्याकरिता सरकारने ग्रामीण भागातील शाळा कुठल्याही परिस्थितीत बंद होणार नाही. त्या शाळा सुसज्ज व गुणवत्तापूर्ण शिक्षण घेण्याचे ठिकाण व्हावे असे नियोजन करावे. हिंगणघाट व समद्रपुर परिसरातून वेना, पोथरा, यशोदा या नद्या वाहतात. या परिसरातील शेतकरी बहुसंख्येने कोरडवाहू शेतीधारक आहेत. त्यांच्या शेतीला बारमाही सिंचन उपलब्ध झाले पाहिजे. याकरिता सर्वसमावेशक नियोजन करणे अत्यंत गरजेचे आहे. त्या दृष्टीने जिल्ह्यातील नद्यांचे सर्वेक्षण करून सिंचनाची सोय करण्याचे नियोजन करण्यात यावे. तसेच या नद्यांच्या दोन्ही बाजूंच्या काठावरील गावांना जोडणारे ब्रिज कम बंधारा, ज्यात किमान पाच एम सी एफ टी पाणी साठविण्यात येईल या पद्धतीचे सर्व गावांना ब्रिज कम बंधारे तयार करण्यात आले तर दोन्ही गावातील वाहतूक सुरू होईल. तसेच साठवण्यात येणाऱ्या पाण्यातून त्या परिसरातील जमिनीतील पाण्याची पातळी उंचावेल त्यातून शेतकऱ्यांची उत्पादकता वाढेल असे नियोजन करावें.
वरील सर्व विषयांची योजना तयार करून जिल्हा नियोजन सभेत मंजूरी प्राप्त करावी, यासाठी आवश्यक ती पूर्तता होईल अशी अंमलबजावणी करावी असे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेले आहे. यावेळी विदर्भ विकास आघाडीचे अनिल जवादे यांच्यासोबत गोरख भगत आणि महेश माकडे हे उपस्थित होते.

