महावितरणकडून GST कापून रक्कम परत केल्या प्रकरणी काँग्रेसकडून चेक ची होळी
काँग्रेसच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन सादर.
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809.
देसाईगंज (वडसा), जि. गडचिरोली –
आरमोरी विधानसभा क्षेत्रातील अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतीच्या सिंचनासाठी कृषी पंपाच्या वीज कनेक्शनसाठी महावितरण कार्यालयाकडे चार ते पाच वर्षांपूर्वी डिमांड भरली होती. मात्र, इतका कालावधी उलटूनही अद्याप प्रत्यक्ष वीज कनेक्शन मिळालेले नाही, ही गंभीर आणि अन्यायकारक बाब आहे.
या काळात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले असून, शेतीसाठी आवश्यक असलेले पाणी न मिळाल्यामुळे त्यांचा व्यवसाय अडचणीत आला आहे.
विशेष म्हणजे, आता महावितरणकडून भरलेली रक्कम परत केली जात आहे, मात्र तीही पूर्णपणे नाही. परत करताना त्यातून GST कापण्यात येत आहे, जो शेतकऱ्यांच्या दृष्टीने आणखी एक अन्यायकारक निर्णय आहे. शेतकऱ्यांनी जी रक्कम संपूर्णपणे भरली, ती पूर्ण परत न करता त्यातून कर वजा करणे हे अन्यायकारक असून शेतकऱ्यांचा अपमान आहे, असे ठाम मत व्यक्त करण्यात येत आहे.
या पार्श्वभूमीवर आमदार मा. रामदास मसराम, गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली, माजी जि. प. उपाध्यक्ष तथा कुरखेडा तालुका अध्यक्ष जीवन पाटील नाट, कोरची तालुका अध्यक्ष मनोज अग्रवाल वळसा तालुकाध्यक्ष राजेंद्र बुल्ले, महाराष्ट्र युवक प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष ऍड. विश्वजित कोवासे, शहराध्यक्ष सतीश विधाते,माजी सभापती परसराम टिकले,अनुसूचित जाती सेल अध्यक्ष रजनीकांत मोटघरे,ता.अध्यक्ष वसंत राऊत,उपध्यक्ष अनिल कोठारे,परीवहन सेल अध्यक्ष रुपेश टिकले,शंकरराव सालोटकर, जितेंद्र मूनघाटे,हरबाजी मोरे,रमेश चौधरी,ढीवरू मेश्राम,पिंकू बावणे, जावेद शेख, कुणाल ताजने सह इतर पदाधिकारी व शेतकऱ्यांच्या वतीने उपविभागीय अधिकारी, देसाईगंज यांना निवेदन सादर करण्यात आले.
निवेदनात, संबंधित सर्व लाभार्थ्यांना त्यांच्या भरलेल्या डिमांडच्या आधारे तात्काळ कृषी पंपासाठी वीज कनेक्शन देण्यात यावे, आणि जी रक्कम परत केली जात आहे, ती शंभर टक्के परत करण्यात यावी – कोणताही GST किंवा अन्य वजावट न करता, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे.

