मानव विकास बस तीन तास उशिरा; प्रवाशांत संताप
राजुरा एसटी आगाराविरोधात पत्रकार संघ आक्रमक
संतोष मेश्राम
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
मो न 9923497800
राजुरा:- महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, मुंबई शाखा राजुरा यांच्या वतीने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ राजुरा आगार व्यवस्थापकांना निवेदन देण्यात आले. घाटंजी, यवतमाळ, दारव्हा तसेच कोरपणा मार्गे वणी या बस फेऱ्या बंद केल्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत असल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे.
राजुरा शहरातून घाटंजी, यवतमाळ आणि दारव्हा येथे दररोज मोठ्या प्रमाणात प्रवासी प्रवास करीत होते. या फेऱ्यांमुळे आगाराला चांगले उत्पन्न मिळत असतानाही त्या अचानक बंद करण्यात आल्याने प्रवाशांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक कार्यासाठी ये-जा करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. कोरपणा मार्गे वणी जाणारी बस बंद झाल्याने परिस्थिती आणखी बिकट झाली आहे.
दि. ७ मार्च रोजी मानव विकास शेड्युल क्रमांक ३२ कोष्टाला जाणारी बस तब्बल तीन तास उशिरा सोडण्यात आल्याचा प्रकार घडला. या विलंबामुळे शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले. मानव विकास योजनेअंतर्गत धावणाऱ्या बसेस विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी असताना असा हलगर्जीपणा अक्षम्य असल्याची भावना व्यक्त करण्यात आली. बस वेळेत न सोडल्यास परीक्षेपासून वंचित राहण्याची वेळ आली तर त्याची जबाबदारी कोण घेणार असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे.
यापूर्वी राजुराचे आमदार देवराव भोंगळे यांच्या कार्यालयामार्फत दि. २३ जानेवारी २०२६ रोजी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ चंद्रपूर विभाग यांना पत्र देण्यात आले होते. मात्र अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने प्रवाशांत नाराजी व्यक्त होत आहे.
निवेदन देताना संघाचे तालुका अध्यक्ष प्रा. अनंत डोंगे, डिजिटल मीडिया जिल्हाध्यक्ष ॲड. राहुल थोरात, डिजिटल मीडिया तालुकाध्यक्ष संतोष मेश्राम, सचिव राकेश कलेगुरवार तसेच सहसचिव लोकेश पारखी उपस्थित होते. बंद करण्यात आलेल्या बस फेऱ्या तात्काळ सुरू करून मानव विकास बस वेळेत धावाव्यात अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.

