*वाहतूक नियमभंगाविरोधात पंधरा दिवसांत 615 प्रकरणांवर कारवाई; 14.46 लाखांचा दंड वसूल*
*उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाची विशेष मोहीम*
*वाहन चालकांचे समुपदेशन करून रस्ता सुरक्षा जनजागृतीलाही प्राधान्य*
मधुकर गोंगले, उपसंपादक.
मो. नं. 9420751809.
गडचिरोली, (जिमाका) दि. 21 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात रस्ता सुरक्षा नियमांची प्रभावी अंमलबजावणी करून अपघातांचे प्रमाण कमी करण्याचे निर्देश दिले होते. त्या अनुषंगाने गडचिरोली जिल्ह्यात उपप्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत मागील पंधरा दिवसांपासून विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येत असून, विविध वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली आहे. या कालावधीत एकूण 615 प्रकरणे नोंदवून संबंधितांकडून 14 लाख 46 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
या मोहिमेत हेल्मेट न वापरणाऱ्या 22 वाहनचालकांवर, वाहन चालविताना मोबाईलवर बोलणाऱ्या 12 जणांवर, अतिवेगाने वाहन चालविणाऱ्या 72 चालकांवर तसेच सीट बेल्ट न लावणाऱ्या 64 वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली. याशिवाय वेग नियंत्रक नसलेल्या 12 वाहनांवर, ताडपत्रीविना मालवाहतूक करणाऱ्या 21 वाहनांवर, मागील सुरक्षा संरचना (आरयुपीडी) नसलेल्या 35 तसेच बाजूची सुरक्षा संरचना (एलयुपीडी) नसलेल्या 18 वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.
योग्यता प्रमाणपत्र नसलेल्या 13 वाहनांवर, वैध परवाना नसलेल्या 27 चालकांवर, परावर्तिका नसलेल्या 82 वाहनांवर तसेच धोकादायक ‘डॅझलिंग लाईट’ वापरणाऱ्या 93 वाहनांवर कारवाई करण्यात आली. विरुद्ध दिशेने वाहन चालविणाऱ्या 7, नो पार्किंग क्षेत्रात वाहने उभी करणाऱ्या 37, मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्या 7 तसेच प्रेशर हॉर्नचा वापर करणाऱ्या 16 वाहनचालकांवरही कारवाई करण्यात आली.
तसेच अतिभार वाहतूक करणाऱ्या 14 वाहनांवर, अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या 13 वाहनांवर, ट्रिपल सीट वाहन चालविणाऱ्या 14 जणांवर तसेच नोंदणी क्रमांक नसलेल्या 14 वाहनांवर कारवाई करण्यात आली. अग्निशामक यंत्रणा व फर्स्ट एड किट नसलेल्या 23 वाहनांवर तसेच आपत्कालीन बाहेर पडण्याची सुविधा नसलेल्या 13 वाहनांवरही दंड आकारण्यात आला आहे.
उपप्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत रस्ता सुरक्षेला प्राधान्य देत केवळ दंडात्मक कारवाई न करता वाहन चालकांचे समुपदेशन करून वाहतूक नियमांचे पालन करण्याबाबत जनजागृती करण्यात येत आहे. नागरिकांनी स्वतःच्या व इतरांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.
