मधुकर गोंगले, उपसंपादक.
मो. नं. 9420751809.
एटापल्ली : तालुक्यातील गेदा गावाजवळ भरधाव दुचाकी रस्त्यालगतच्या झाडावर आदळल्याने आज सकाळी झालेल्या भीषण अपघातात एका युवकाचा जागीच मृत्यू झाला असून दुसरा युवक गंभीर जखमी झाला आहे. या दुर्घटनेमुळे गेदा गावासह परिसरात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सागर तोंदे नरोटे (वय 25) यांचा अपघातात जागीच मृत्यू झाला, तर रितिक दोहे नरोटे (वय 16) हे गंभीर जखमी झाले आहेत. दोघेही मावसभाऊ असून रेगडी गावचे रहिवासी असल्याचे सांगण्यात आले. अपघातावेळी ते दुचाकी क्रमांक MH33AE0813 वरून प्रवास करत होते.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघेही कृष्णार येथे एका कार्यक्रमात गेले होते. कार्यक्रम आटोपून ते परत आपल्या गावी येत असताना गेदा गावाजवळ दुचाकी चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. भरधाव वेगातील दुचाकी थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर जोरात आदळली. धडक इतकी भीषण होती की सागर तोंदे नरोटे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर रितिक नरोटे गंभीर जखमी अवस्थेत रस्त्यावर पडले होते.
घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. जखमी रितिक नरोटे यांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात हलविण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.
सदर घटनेची माहिती मिळताच एटापल्लीचे पोलीस निरीक्षक नागरगोजे साहेब तसेच पोलीस उपनिरीक्षक साखरे साहेब यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थितीची पाहणी केली. पोलिसांनी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे.
या दुर्दैवी घटनेमुळे रेगडी गावात हळहळ व्यक्त केली जात असून नरोटे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
दरम्यान, ग्रामीण भागात वाढत्या रस्ते अपघातांमुळे नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. भरधाव वेग, खराब व अरुंद रस्ते, सुरक्षेच्या उपाययोजनांचा अभाव ही अपघातामागील प्रमुख कारणे असल्याचे बोलले जात आहे.

