✒️प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा, दि.2:- वर्धा जिल्हात वाळूच उत्खनन करून मोठ्या प्रमाणात तस्करी सुरू आहे. त्यामुळे या अवैध वाळू तस्करीवर जिल्हा प्रशासन कठोर कारवाई करत आहे. यात अनेक राजकीय नेत्याचे चेले चपाटे सामील असल्यामुळे स्थानिक पातळीवर प्रशासनाला मर्यादा येत आहे. पण जिल्हा प्रशासनाने सुरू केलेल्या धडक कारवाई मुळे अशा अवैध वाळू वाहतूक तस्करीला काही प्रमाणात लगाम लागू शकते.
वर्धा जिल्हातील देवळी तालुक्यातील गुंजखेडा वाळूघाटावर तराफ्याच्या माध्यमातून वाळूचे अवैध उत्खनन होत असल्याप्रकरणी जिल्हास्तरीय आकस्मिक धाड तपासणी पथकाने केलेल्या कारवाईत चार तराफे जप्त करण्यात आले.
जिल्हास्तरीय आकस्मिक धाड तपासणी पथक गस्तीवर असतांना देवळी तालुक्यातील गुंजखेडा येथील वाळूघाटावर 4 तराफ्याव्दारे व 8 मजुरांच्या मदतीने पाण्याखालील वाळूचे अवैधरित्या उत्खनन सुरु असल्याचे आढळून आले. पथकाची चाहूल लागताच सर्व मजूरांनी पळ काढला. पाण्यावर तरंगत असलेले वाळूचे भरलेले चारही तराफे महसूल विभागाच्या पथकाने जप्त केले. प्रत्येकी 40 हजार याप्रमाणे 4 तराफ्यांची एकुण किंमत 1 लाख 60 हजार रुपये इतकी आहे. मुद्देमाल महसूल विभागाच्या पथकाने नष्ट केला आहे.
सदर कारवाई जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनात जिल्हा खनिकर्म अधिकारी, देवळीचे तहसिलदार यांचा पथकाने केली. जिल्ह्यात कोणीही अवैध गौणखनिज उत्खनन व वाहतुक करु नये, अन्यथा कायदेशीर करवाई करण्यात येईल असे, जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

