✒️अमरावती जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अमरावती:- शहरातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथ प्रतिष्ठित अभियांत्रिकी कॉलेज मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा गळा चिरून हत्या करण्यात आली. या विद्यार्थिनीचा मृतदेहाजवळ तिचा मित्रही जखमी अवस्थेत पडून होता. या मित्रानेच सदर विद्यार्थिनीची हत्या करून त्यानंतर आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची बाब पोलिसांच्या प्राथमिक तपासातून पुढे आली.
काय आहे घटना…
10 मे बुधवार ला सकाळी साडेसात ते आठ वाजताच्या सुमारास बडनेरा पोलिस स्टेशनच्या हद्दीतील वडुरा गावात ही घटना घडली. संजना शरद वानखडे वय 19 वर्ष, रा. कांडली, परतवाडा असे हत्या करण्यात आलेल्या युवतीचे नाव असून तिचा मित्र सोहम गणेश ढाले वय 19 वर्ष, रा. तुळजापूरगढी हा गंभीर जखमी आहे. त्याच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
संजना व सोहम दोघेही वेगवेगळ्या ठिकाणी भाड्याची खोली घेऊन राहत होते. मंगळवारी रात्री आठ ते साडेआठ वाजताच्या सुमारास दोघेही संजनाच्या दुचाकीने निघाले होते. दिनाक 10 मे ला सकाळी युवतीच्या मृतदेहाशेजारीच जखमी अवस्थेत पडून असलेल्या सोहमने आरडाओरड केल्याने काही लोक जमले. नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली. घटनेची गंभीरता बघता पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, उपायुक्त विक्रम साळी घटनास्थळी दाखल झाले. जखमी सोहम ढाले याला उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. मृत युवतीच्या गळ्यावर चाकूसारख्या धारदार शस्त्राने दोन वार केल्याचे दिसून आले. याव्यतिरिक्त हातावर सुद्धा जखमा होत्या, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. घटनास्थळी दुचाकी आढळली. ती दुचाकी मृत युवतीची असल्याचे पोलिसांनी सांगितले. युवतीची हत्या नेमकी कशातून झाली. युवकावर कुणी वार केले, याबाबत सुरवातीला संभ्रमावस्था निर्माण झाली होती. परंतु तपासाअंती मृत युवतीचा चुलत भाऊ अमित दिलीप वानखडे वय 37 वर्ष यांनी बडनेरा पोलीस स्टेशन मध्ये तक्रार नोंदविली. त्या आधारे पोलिसांनी सोहम ढालेविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला, असे पोलिस निरीक्षक नितीन मगर यांनी सांगितले. दोघेही एकाच अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रथम वर्षाच्या सेकंड सेमिस्टरला शिकत होते.
हल्ला झाल्याचा बनाव
आमच्यावर दोन अज्ञात व्यक्तींनी हल्ला केला, असे जखमी सोहमने पोलिसांना सांगितले. सोहमने पोलिसांना दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार तो व संजना वडुरा येथे बोलत असताना अचानक तेथे दोन जण आले. त्यांनी सोहम व संजनाशी वाद घातला व नंतर एकाच वेळी हल्ला केला.
संजनाला दिली होती धमकी..
संजना व सोहम यांच्यात एक वर्षापासून ओळख होती. परंतु सोहमच्या त्रासामुळे ती त्याच्याशी ब्रेकअप करणार होती. परंतु सोहम त्यासाठी तयार नव्हता. त्यामुळे तो संजनाला मानसिक त्रास देत होता. फसविण्याच्या व जीवानिशी ठार मारण्याच्या धमक्या देत होता, असे संजनाच्या भावाने पोलिसात दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे.

