✒️प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
मोबा नंबर :- 9284981757
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा, दि.9:- देशासाठी आपल्या प्राणांचे बलिदान दिलेल्या ‘वीरांना’ श्रद्धांजली वाहण्यासाठी संपूर्ण देशभरात ‘मेरी माटी, मेरा देश’ अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत आज ऑगस्ट क्रांती दिनी जिल्हाधिकारी कार्यालयासह संपुर्ण जिल्हाभर ठिकठिकाणी पंचप्रण शपथ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी उपस्थित अधिकारी, कर्मचाऱ्यांना शपथ दिली.
यावेळी अप्पर जिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, निवासी उपजिल्हाधिकारी अर्चना मोरे, उपजिल्हाधिकारी प्रियांका पवार, जिल्हा पुनर्वसन अधिकारी अंजली मरोड, निवडणूक उपजिल्हाधिकारी अनिल गावित, उपविभागीय अधिकारी दिपक कारंडे, तहसिलदार रमेश कोळपे, नायब तहसिलदार अजय धर्माधिकारी, अतुल रासपायले व जिल्हाधिकारी कार्यालय, उपविभागीय अधिकारी कार्यालय व तहसिल कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना भारतास 2047 पर्यंत आत्मनिर्भर आणि विकसित राष्ट्र बनविण्याचे स्वप्न साकार करु, गुलामीची मानसिकता मुळापासुन नष्ट करु, देशाच्या समृध्द वारशाचा गौरव करु, भारताची एकात्मता बलशाली करु आणि देशाच्या संरक्षण करणाऱ्यां प्रती सन्मान बाळगू व देशाचे नागरिक म्हणुन सर्व कर्तव्याचे पालन करु, अशी शपथ हातात मातीचे दिवे व माती घेऊन देण्यात आली.
कार्यालये, ग्रामपंचायत, शाळांमध्येही शपथ
जिल्ह्यातील जिल्हास्तरीय विविध विभागाच्या शासकीय कार्यालयात विभाग प्रमुखांच्या उपस्थितीत कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना पंचप्रण शपथ देण्यात आली तसेच तालुका स्तरावरील तहसिल कार्यालय, पंचायत समितीसह अन्य कार्यालयांमध्ये देखील शपथ कार्यक्रम घेण्यात आला. ग्रामपंचायती व शाळांमध्ये आयोजित या कार्यक्रमात विद्यार्थी तथा सर्वसामान्य नागरिक हातात मातीचा दिवा व माती घेऊन मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

