युवराज मेश्राम विदर्भ ब्युरो चीफ नागपुर
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपुर:- आघाडीमध्ये असताना राष्ट्रवादी काँग्रेसला दुय्यम स्थानी ठेवले जात असे, आम्ही देखील मोठ्या मनाने ते स्वीकारत होतो. यामुळे आमचे कार्यकर्ते मागे पडायचे, ही खंत असायची. मात्र तो भूतकाळ समजून, सर्व काही विसरून, सर्वसामान्यांच्या हितासाठी घेतलेल्या निर्णयातून संधी प्राप्त होणार आहे. या संधीचे सोने करून घेण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे मार्गदर्शन मा. खा. प्रफुल पटेल यांनी आज नागपूर येथील वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित राष्ट्रवादी काँग्रेसच्या संकल्प मेळाव्यात कार्यकर्त्यांना केले.
मागील दोन महिन्यांमध्ये एक वेगळा विचार करण्याचा प्रसंग का आला? भूतकाळात पक्ष वाढीचे जे प्रसंग आले त्यात आम्ही वरचढ असूनही दुय्यम स्थान आम्हाला देण्यात आले. नेहमी आघाडी टिकवण्यासाठी आम्हाला माघार घ्यावी लागली. आम्ही पक्षाच्या वाढीसाठी, जनतेच्या हितासाठी व विकासासाठी आज जो निर्णय घेतला आहे तो निर्णय आपल्या सर्वांच्या भल्यासाठी असून आम्ही कधीही छत्रपती शिवाजी महाराज, फुले- शाहू- आंबेडकर यांच्या विचारांशी तडजोड करणार नाही, याची ग्वाही मा. प्रफुल पटेल यांनी दिली.

नागपूर जिल्ह्यात व शहरात पक्ष वाढीसाठी आगामी काळात जास्तीत जास्त जागा घेऊन पक्षाचा विस्तार व संघटन करणार असल्याचे त्यांनी सांगितले. जे गेले त्यांची चिंता न करता जे सोबत आहेत त्यांना सोबत घेऊन विदर्भात पक्षाचा विस्तार व वाढीसाठी कार्यकर्त्यांना ताकतीने संधी देण्याचे काम करू, असे त्यांनी कार्यकर्त्यांना आश्वस्त केले.
या मेळाव्याला अन्न व औषध प्रशासन मंत्री मा. धर्मरावबाबा आत्राम, आमदार राजू कारेमोरे, माजी खासदार नाना पंचबुधे, ओबीसी सेल राज्य समन्वयक ईश्वर बाळबुधे, माजी आमदार राजेंद्र जैन, नागपूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष शिवराज गुजर, गडचिरोली जिल्हाध्यक्ष गंगाधर परशुरामकर, चंद्रपूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर, नागपूर शहराध्यक्ष प्रशांत पवार, नागपूर शहर कार्याध्यक्ष श्रीकांत शिवणकर, आभाताई पांडे, सुनिल फुंडे यांच्यासह पार्टीचे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

