मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गडचिरोली:- जिल्हातून एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. दोन दुचाकी गोंडपिपरी मार्गे चंद्रपूरला जात असताना विरुद्ध दिशेने चंद्रपूर वरून सुरजागडला लोह खनिज आणण्या करिता जाणाऱ्या हायवाची दुचाकींना जबर धडक दिली यात तिघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना दि (४) रविवारी दुपारी बारा वाजता दरम्यान घडली आहे.
अहेरी चंद्रपुर राष्ट्रीय महामार्गावर दिवस रात्र लोह खनिजाच्या कच्चा मालाची वाहतूक सुरू आहे. याआधी अनेक अपघात या मार्गावर घडले आहे. अनेकांना जीव गमवावा लागला. काहींना अपंगत्व आले. गोंडपीपरी तालूक्यात विठ्ठलवाडा, तारसा, नवेगाव सुरगाव मार्गावर पार्किंगची सोय नसतानाही अनेक वाहने उभी असतात.मात्र वाहतूक पोलीस विभाग याकडे दुर्लक्ष करीत आहेत. सोबतच रस्त्यावरील उभी वाहने अपघातास कारणीभूत ठरत आहेत.
असे असताना आकसापूर मार्गावर सुरजागडच्या हायवाने दुचाकीस्वारास चिरडल्याची घटना घडल्याने सुराजगड वाहन अजुन किती नागरीकांचे बळी घेणार असा प्रश्न नागरीकांना पडला आहे. अपघाताच्या घटना घडत असल्याने तालुक्यातील नागरिकात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहेत.
अहेरी- चंद्रपुर राष्ट्रीय मार्गावरील आक्सापूर येथील मंदिरासमोर MH 33 K 6739, MH 34 AG 3224 या दोन दुचाकींना आज रविवारला दुपारच्या सुमारास हायवाने जबर धडक दिली. दरण्यांन दुचाकी चालकाचे नियंत्रण सुटल्याने अन्य एका दुचाकीला जबर धडक बसली यात एकाच गावातील तिघांचा जागीच मृत्यू झाला.
अपघाताची माहिती मिळताच अनेकांनी घटनास्थळी गर्दी केली. घटनास्थळी कोठारी व गोंडपिपरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
अपघाती हायवा वाहनाचा क्रमांक एम एच 40 सी एम 3233 असून शैलेंद्र कालिप्तराय वय 63 वर्ष रा.विजनगर मुलचेरा, जी.गडचिरोली, अमृतोष सुनील सरकार 34 कालीनगर, मनोज निर्मल सरदार 43 विजयनगर असे मृतकाची नावे आहेत.
या अपघाताची माहिती मिळताच पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदना साठी बल्लारशाह येथील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले असून पुढील तपास कोठारी व गोंडपिंपरी पोलीस करीत आहे. घटना घडताच हायवा चालकानी घटनास्थळावरून पोबारा केला असून पोलिसाकडून चालकाचा शोध सुरू आहे.

