अनिल कडू विशेष प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- बँक ऑफ इंडियाच्या हिंगणघाट शाखेत ग्राहकांचे खाते केवायसी करण्याकरिता दोन आठवड्या पर्यंत खाते बंद राहात असल्याने खातेधारकांचे व्यवहार ठप्प पडून ते अडचणीत सापडले आहेत.
आता कोणत्याही बँकेत दर काही ठरावीक वर्षांनी बँकेमध्ये आधार कार्ड, पॅन कार्ड, फोटो व स्वाक्षरी देउन आपले खाते सुरळीत (अपग्रेड) करावे लागते. म्हणजेच त्याला केवायसी करणे असे म्हणतात. पहीले ही प्रक्रिया एका टप्प्यात पार पडत असे. बँकेत खातेधारकाने आवश्यक कागदपत्र दिल्यावर तेव्हाच्या तेव्हा आपल्या पातळीवर बँकेचा कर्मचारी केवायसी करुन त्या खातेदाराचे खाते सुरळीत करुन देत असे. आता मात्र सेंट्रल केवायसी सुरु झालेले आहे. ही सेंट्रल केवायसी ची प्रक्रिया तब्बल चार टप्प्यांची असुन ही पद्धत केंद्राशी जुळलेली असल्याने ही केवायसी व्हायला कमीतकमी पाच दिवस लागतात. म्हणजेच ग्राहकाचे खाते बंद झाल्या नंतर त्याने केवायसीचे कागदपत्र बँकेत जमा केल्यावर खाते सुरु व्हायला लागणारा हा पाच दिवसांचा प्रवास आहे.
परंतु सगळ्या राष्ट्रीय कृत बँकांचा विचार करता बँक आफ इंडियाच्या हिंगणघाट शाखेत या केवायसी च्या कामाला म्हणजेच बंद झालेले खाते सुरु करायला तब्बल पंधरा दिवस पर्यंत किंवा अधिकचा वेळ लागत असल्याने खातेधारकांची मोठ्या प्रमाणावर अडचण होत आहे. ही त्रुटी दुर करण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे शाखा व्यवस्थापक ने स्पष्टीकरण दिले.
अगोदर बँकेत फिनॅकल -7 हे सॉफ्टवेअर होते. त्यावेळी केवायसी ची एका टप्प्याची व आमच्या स्तरावरचीच प्रक्रिया असल्याने तात्काळ केवायसी होत असे. नंतर फिनॅकल-10 हे नविन साफ्टवेअर आले. त्यातल्या त्यात इतर बँकांमध्ये हे सॉफ्टवेअर २०१९ लाच आलेले असतांना आमच्या बँकेत २०२२ ला आले. केंद्राशी सलग्ण ही सगळी प्रक्रिया आहे. आमचे काम फक्त कागदपत्रे अपलोड करणे हेच आहे. नविन साॅफ्टवेअर असल्याने तांत्रिक अडचणी येतात. कर्मचार्यांचा तुटवडा असतो त्याचीही अडचण होते. त्यामुळे केवायसी व्हायला थोडा उशिर होत असल्याचे बँक आफ इंडिया हिंगणघाट शाखेचे व्यवस्थापक घनश्याम परमार यांनी सांगीतले. परंतु आम्ही कर्मचार्यांना जास्त वेळ बसवून त्या दिवशीची कामे त्याच दिवशी हातावेगळी करण्याचे निर्देश दिले असल्याचेही ते म्हणाले.

