मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गडचिरोली:- जिल्ह्यात रानटी हत्तींने धुमाकूळ घातला आहे. या रानटी हत्तीने 25 एप्रिलला दुपारी 4 वाजताच्या सुमारास भामरागडच्या कियर जंगलात एका शेतकऱ्यास पायाखाली चिरडले आणि बळी घेतला आहे. त्यामुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली आहे. गोंगलू रामा तेलामी वय 46 वर्ष राह. कियर ता. भामरागड असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे.
रानटी हत्तीने दोन आठवड्यांपूर्वी प्राणहिता नदी ओलांडून तेलंगणात प्रवेश केला होता. सीमावर्ती भागात धुडगूस घालत या हत्तीने दोन शेतकऱ्यांचा बळी घेतला होता. त्यानंतर तो पुन्हा गडचिराेली जिल्ह्याच्या हद्दीत परतला आहे. या हत्तीने बल्लाळम येथील घनदाट जंगलात ठाण मांडल्यानंतर 24 एप्रिल रोजी रात्रीपासून आपला मोर्चा कियर जंगलाकडे वळवला. या जंगलाला चिकटून गोंगलू तेलामी यांची जमीन आहे. 25 रोजी ते शेतात काम करत होते. यावेळी रानटी हत्तीने त्यांना सोंडेने उचलून जमिनीवर आदळले व त्यानंतर पायाखाली चिरडले. यात त्यांचे शरीर छिनविछिन्न झाले.
या घटनेनंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांचीही माेठी गर्दी झाली आहे. या हत्तींमुळे परिसरात मोठी दहशत निर्माण झाली आहे. त्यामुळे हत्तीचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.

