धाबा येथे शेतकरी मेळाव्यात ॲड. वामनराव चटप यांचे प्रतिपादन.
राजेंद्र झाडे, चंद्रपूर उपजिल्हा प्रतीनीधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गोंडपिपरी:- गोंडपिपरी तालुक्यातील धाबा येथे शेतकरी संघटनेने शेतकरी मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्याला शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्जमुक्त करावे, शेतमालाला उत्पादनखर्चावर आधारित रास्त भाव द्यावा, शेतजमिनीचे प्रलंबित पट्टे द्यावे, पिकविमा जमा करावा आदी मागण्या ठेवण्यात आल्या. शेतकऱ्यांना कर्जमुक्त व युवकांना रोजगारयुक्त केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असे प्रतिपादन ॲड. वामनराव चटप यांनी केले. गोंडपिपरी भागात १४ वर्षांपासून विकास थांबला आहे. भाजप-काँग्रेस दोन्ही पक्षांतील निवडून आलेले आमदार गोंडपिपरी तालुक्यातील प्रश्न सोडविण्यात असमर्थ ठरले आहे. ही माझी शेवटची निवडणूक आहे. जाती-पातीच्या आधारावर नव्हे तर कार्यक्षमता आणि विकासाची अभ्यासू दूरदृष्टी याकडे बघून मतदान करा. ४४ वर्षांचा संघर्ष लक्षात घेऊन मला विधानसभेत पाठवा अशी भावनिक साद ॲड. वामनराव चटप यांनी घातली.
तालुक्यात अनेक महत्वपूर्ण पदावर प्रभारी अधिकारी दिसतात. पोडसा पुलाची दुरुस्ती, गोंडपिपरी जिल्ह्यात उपजिल्हारुग्णालय, सिंचन प्रकल्प विकास, शेतमाल प्रक्रिया उद्योग उभारणी आदी प्रलंबित विकासकामे मार्गी लावण्यासाठी संघटना कार्यरत असेल असा सूर मान्यवरांनी व्यक्त केला. यावेळी निवृत्त गटविकास अधिकारी शालीकराव माऊलिकर, शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष अरुण पाटील नवले, स्वतंत्र भारत पक्ष जिल्हाध्यक्ष निळकंठ कोरांगे, शेवेनिंग स्कॉलर ॲड. दीपक चटप, ॲड. प्रफुल आस्वले, तालुकाध्यक्ष रामकृष्ण सांगडे, कपिल इद्दे, मनोज कोपावार, मालनताई दुर्गे, मारोती भोयर आदींची उपस्थिती होती.
धाबा शहरातून बैलबंडीवर ॲड. वामनराव चटप यांची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली.धाबा येथील ५० युवकांचा शेतकरी संघटनेत प्रवेश तर तालुक्यातील शेकडो शेतकरी देखील संघटनेत प्रवेशित झाले.

