स्वाती खंडागळे, सातारा जिल्हा प्रतिनिधी
नवी दिल्ली/ मुंबई:- महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल केलेल्या वादग्रस्त विधानामुळे त्यांना महाराष्ट्राच्या राज्यपाल पदावरून हटविण्याची मागणी जोर धरू लागली आहे. अनेक राजकीय पक्षांनी राज्यपालांना टीकेचे लक्ष केले आहे. भाजपाचे खासदार उदयनराजे भोसले यांनी राज्यपालांवर आक्रमकपणे टीका करीत त्यांच्या हकालपट्टीची मागणी केलेली आहे. जोपर्यंत राज्यपाल भगतसिंग कोशारी यांची हकालपट्टी होत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नसल्याचा इशारा उदयनराजे यांनी दिला आहे. राज्यपालांसाठी उदयनराजे यांनी केलेली मागणी रास्ता असून, आम्ही सर्वजण त्यांच्याशी सहमत असल्याचे सांगून मराठा समाजाच्या विविध संघटनांनी राज्यपाल कोशारी यांना हटविण्याची मागणी केलेली आहे. त्याचप्रमाणे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना अशा विविध पक्षांनी देखील राज्यपाल भगतसिंग कोशारी यांची हकालपट्टी करण्याची मागणी केलेली आहे.
गुजरात राज्यात विधानसभेच्या निवडणुका चालू असल्यामुळे सध्या केंद्र सरकारमधील निर्णय क्षमता असलेले नेते गुजरात मधील निवडणूक प्रक्रियेत व्यस्त आहेत, त्यामुळे राज्यपालांच्या निर्णयाबाबतीत विलंब होत आहे, परंतु महाराष्ट्रातील येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पाहता विविध पक्ष आणि मतदारांच्या नाराजीचा सामना करणे सत्ताधारी असलेल्या सरकारला परवडणारे नाही, त्यामुळे गुजरात विधानसभेच्या निवडणुकीतील मतदान प्रक्रिये नंतर राज्यपाल भगतसिंग कोशारी यांची महाराष्ट्राच्या राज्यपाल पदावरून हकालपट्टी केली जाण्याची दाट शक्यता आहे.