मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अहेरी:- भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक आदिवासी योद्धांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. याला आपल्या इतिहासच साक्षी आहे. यामुळे आदिवासी समाजाने नेहमी एकजुटीने व संघटित राहणे गरजेचं असून, आज देशभरात सगळीकडे स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सव साजरा होत असून या स्वातंत्र्यात आदिवासी योद्धांची मोलाची भूमिका असल्याचे प्रतिपादन भारत राष्ट्र समितीचे नेते,आदिवासी विद्यार्थी संघाचे विभागीय अध्यक्ष व माजी आमदार दिपक दादा आत्राम यांनी केले.
ते अहेरी तालुक्यातील किष्टापूर (वेल) येथे जय सेवा स्मारक समिती द्वारा आयोजित बिरसामुंडा पुतळा व कुपारलिंगो पुतळ्याचे अनावरण तथा सल्ला गांगराचे स्थापना व कोया पूनेम धर्म संमेलन कार्यक्रमाच्या सहउदघाटक म्हणून बोलत होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माजी आ. डॉ. नामदेवराव उसेंडी, प्रमुख पाहुणे म्हणून कोया पूनेम गोंडवाना महासभाचे राष्ट्रीय अध्यक्ष मंगलाताई उईके, किष्टापूरचे सरपंच नंदू तेलामी, वेलगुरचे सरपंच किशोर आत्राम, महेश मडावी, माजी प.स.उपसभापती गीता चालूरकर, बाबुराव तोरेम, अनिल कोठारे, गणेश तलांडे, शुभम शेंडे, शंकर आत्राम, तिरुपती मडावी, उपसरपंच उमेश मोहूर्ले, भगवान आत्राम, अनिल दब्बा, विनोद कावेरी, हरिदास आत्राम, पोलीस पाटील महेश अर्का, आनंदराव चहाकाटे, अजय मडावी, साईनाथ नागोसे, प्रवीण रेषे, गोमणी ग्राप सदस्य गणेश तलांडे, सतीश पोरतेट आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.
पुढे बोलतांना माजी आमदार दिपक दादाआत्राम म्हणाले, आजही आदिवासी समाज मूलभूत गरजा व सोयी सुविधांपासून वंचित आहे. आदिवासी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्या साठी दोन्ही सरकारांनी जातीने लक्ष केंद्रित करने गरजेचे असल्याचेही त्यांनी यावेळी बोलून दाखविले.
यावेळी उपस्थित मान्यवरांनीही समाजबांधवांना मोलाचे मार्गदर्शन केले. बिरसा मुंडा पुतळा व कुपारर्लिंगो पुतळ्याचे अनावरण तथा कोया पूनेम पंडुम दरम्यान विविध कार्यक्रम घेण्यात आले. विविध विषयांवर मान्यवरांनी मार्गदर्शन केले. समाजात असलेल्या रुढी परंपरा व कला गुणांना वाव देण्यासाठी रेलानृत्य स्पर्धा घेण्यात आली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला गोंगो पूजा करून गावात रॅली काढण्यात आली. त्यानंतर सप्तरंगी ध्वजारोहण करून पुतळ्याचे अनावरण तथा सल्ला गांगराची स्थापनाचे अनावरण सोहळा व मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रामपंचायत सदस्य वामन मडावी यांनी केले तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समाज बांधवांनी सहकार्य केले.

