विश्वास त्रिभुवन अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अहमदनगर:- आजच्या काळामध्ये टी.व्ही. आणि मोबाईल मध्ये मग्न असलेल्या पिढीला मैदानी खेळांकडे वळवावे, खेळामुळे व्यक्तीचा शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक विकास होतो. शिवाय त्यांना नैराश्य पचविण्याची सवय लागते. असे प्रतिपादन न्यू इंग्लिश स्कूल अस्तगाव विद्यालयात आयोजित पावसाळी क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी प्रसिद्ध रणजी क्रिकेटपटू रणजीत बोठे यांनी केले आहे.
खेळामुळे शरीर तंदुरुस्त होते. खेळामुळे आपले आयुष्य वाढते. टी.व्ही. आणि मोबाईलच्या आहारी गेलेली पिढी ही खेळापासून दूर चालली आहे. ज्या गोष्टीचा मेंदू जास्त विचार करतो त्याच गोष्टीकडे मेंदू आपल्याला घेऊन जात असतो. म्हणून आपण विविध प्रकारचे खेळ खेळले पाहिजेत. जगातील प्रसिद्ध खेळाडू सण, उत्सव बाजूला ठेवून नेहमी सराव करत असतात. आज जन्मतःच बऱ्याच लहान मुलांना शुगर सारखे आजार जडलेले दिसतात. त्यांच्यात व्यायामाची, कसरतीची कमतरता दिसते. त्यामुळे खेळ खेळण्यासाठी मैदानावर या. घाम निघू द्या. घामाच्या रूपाने शरीरातील जीव जंतू बाहेर पडतात. शिवाय आपल्याला कोणतेही व्हायरल इन्फेक्शन होत नाही. आपल्याला लाभलेले शिक्षक आयुष्यात अत्यंत महत्त्वाचे असतात. ते आपले सर्व कुटुंब बाजूला ठेवून विद्यार्थ्यांसाठी वेळ देत असतात. त्यामुळे त्यांच्या मार्गदर्शनाचा आपण फायदा घेतला पाहिजे. असेही त्यांनी यावेळी सांगितले.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने साईकृपा अर्थमूव्हर्सचे संचालक मच्छिंद्र चोळके, राहाता येथील रणजीत क्रिकेट ॲकॅडमीचे संचालक अभिजीत बोठे उपस्थित होते. मच्छिंद्र चोळके यांनी स्पर्धेत सहभागी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. तर राष्ट्रीय कबड्डीपटू आकाश कासार यांनी कबड्डी खेळ कसा खेळावा याचे उत्तम प्रात्यक्षिक खेळाडूंना दाखवून मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व मान्यवरांचे स्वागत प्र. मुख्याध्यापक प्रमोद तोरणे यांनी केले. पावसाळी क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने विद्यालयात कबड्डी, खो-खो, हॉलीबॉल, धावणे, संगीत खुर्ची अशा विविध सामुदायिक व वैयक्तिक स्पर्धांचे आयोजन केलेले आहे. याप्रसंगी क्रीडाशिक्षक सचिन चौधरी, जालिंदर गायकवाड, सखाराम शिंदे, वामन घोडसरे, ज्ञानेश्वर केदार, रोहिदास पोटकुले, संतोष सोनवणे, रंजय कडू, प्रदीप तडवी, प्रतीक्षा थोरात, निर्मला लावरे, वृषाली बेल्हेकर छाया, जेजुरकर कविता घोडसरे आदी शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन संतोष कदम यांनी केले. तर आभार ज्ञानेश्वर राजळे यांनी मानले.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

