मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट, ०५ सप्टेंबर:- कृषी महोत्सव योजने अंतर्गत वर्धा जिल्हयातील महोत्सव हिंगणघाट येथे तालुका स्तरावर घेण्याबाबत माजी आमदार प्रा.राजू तिमांडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषी मंत्री धनंजय मुंडे यांना उपविभागीय अधिकारी मार्फत निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली.
कृषी महोत्सव योजनेअंतर्गत जिल्हयातील महोत्सवासाठी निधी देण्यात येणार असल्याची घोषणा महाराष्ट्र सरकारने केली. राज्यात २०२० पासुन जिल्हा कृषी महोत्सव राबविण्यात येतो. पाच दिवस चालणाऱ्या या महोत्सवात शासनाच्या विविध योजना, उपक्रमांची माहिती, संशोधन कृषी तंत्रज्ञान, नाविन्यपुर्ण प्रयोगशिल शेतकऱ्यांचे अनुभव, बाजारपेठ व्यवस्थापन, कृषीपुरक व्यवसायांचे मार्गदर्शन, कृषी प्रदर्शन, परिसंवाद, शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ व विचारवंत,अनुभवी शेतकरी, उद्योजकांची व्याख्याने आदी उपक्रम कृषी प्रदर्शनात राबविले जातात.
हिंगणघाट क्षेत्राच्या परिसराला समुद्रपुर तालुका, सिंदी (रेल्वे) हमदापुर परिक्षेत्र, राळेगांव तालुका, पांढरकवडा केळापुर तालुका, वणी तालुका, वरोरा तालुका, चिमुर तालुका, उमरेड तालुका लागुन असुन शेतकरी बहुल परिसर आहे. याविषयीची कृषी महोत्सवासाठी महाराष्ट्र सरकारने अर्थसंकल्पात ६ कोटी ८० लाख रूपयांची तरतूद केली आहे. तरी कृषी महोत्सव योजने अंतर्गत वर्धा जिल्हयातील महोत्सव हा हिंगणघाट येथे तालुका स्तरावर घेण्यात यावा अशी आग्रहाची मागणी माजी आमदार प्रा.राजू तिमांडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषी मंत्री धनंजय मुंडे यांना निवेदनाद्वारे केली आहे.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

