पल्लवी मेश्राम, नागपुर शहर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर 23 सप्टेंबर:- काल रात्रीपासून नागपुर जिल्ह्यात ढगाळ वातावरणासह वादळी वारा वाहत होता. त्यामुळे पाऊस येणार असल्याची चिन्हे दिसत होती. अशातच रात्रीच्या सुमारास जोरदार पावसाने हजेरी लावली. नागपूर शहरात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. शहर परिसरात जोरदार पाऊस झाल्याने ठिकठिकाणी पाणी साचल्याचे दिसून आले. त्यामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळित झाले आहे.
मध्य नागपुरातील सीताबर्डी परिसरातील सावत्र पाऊसाचा पाण्याने साम्राज्य निर्माण केल्याचे दृष्य होतं. या भागात इतकं पाणी साचलंय की संपूर्ण मोरभवन बस स्टॉप पाण्याखाली गेलाय. ढगफुटीमुळे संपूर्ण परिसराला नदीचं स्वरुप आलं आहे. इतका हाहा:कार या पावसाने माजवला आहे. त्यामुळे नागपूरकर हवालदिल झाले आहेत.
नागपूरत मागील दोन दिवसापासून रिमझिम पाऊस सुरू होता. काल सायंकाळी पासून पावसाने जोर धरला आणि रात्रीच्या सुमारास विजांच्या गडगडाटासह मोठ्या प्रमाणात ढगफुटी सारखा पाऊस बरसला. त्यामुळे अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो झाला. या तलावाचे पाणी नागपूरच्या मध्यवर्ती भागात म्हणजे सीताबर्डी परिसरात भरलं आहे. एखादी नदी वाहावी इतक्या प्रचंड प्रमाणात तलावाचं पाणी सीताबर्डी परिसरात वाहत आहे. वस्त्यावस्त्यांमध्ये हे पाणी शिरलं आहे. घराघरात पाणी शिरल्याने अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. कुणाचं सिलिंडर वाहून गेलंय तर कुणाची भांडीकुंडी वाहून गेली आहेत. घरातील गद्यांपासून फर्निचरपर्यंत सर्वांचीच वाट लागली आहे.
बर्डी व मोरभवन पाण्यात…
बर्डी परिसरात असलेलं मोरभवन बस स्टॉपला तर नदीचं स्वरूप आलं आहे. बस स्टॉपमध्ये चार ते पाच फुटापर्यंत पाणी साचलं आहे. या पुराच्या पाण्यात 8 ते 10 एसटी अडकल्या आहेत. बस पाण्यात अडकल्याने वाहक आणि चालकांनी एसटीच्या टपावर जाऊन आश्रय घेतला. रात्रभर हे वाहक आणि चालक एसटीच्या टपावर होते. सात ते आठ जण एसटीच्या टपावर अडकून पडले आहेत. त्यांना बाहेर काढण्याचा युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहे. दोरीच्या सहाय्याने त्यांना बाहेर काढलं जात आहे. याच बस स्टॉपच्या बाहेर पुलाखालीही प्रचंड पाणी भरलं आहे. त्यामुळे पुलाखाली अनेक कार अडकून पडल्या आहेत. पावसामुळे अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाली आहे. नागपूरमध्ये इतर भागातही हीच परिस्थिती ओढवली आहे.
नागपुर शहरात ढगफुगी होऊन जोरदार पाऊस पडल्यामुळे शहरात मोठ्या प्रमाणावर पाणी भरल्याने आणीबाणी सारखी स्थिती निर्माण झाली आहे. अग्निशमन दलाचे जवान मदत कार्य करत आहेत. तर जिल्हाधिकाऱ्यांनीही घटनास्थळी येऊन पाहणी केली आहे.
4 तासात 100 मिमी पाऊस
नागपुरात काल रात्रीपासून मुसळधार पावसामुळे अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो झाल्याने काही भागात पाणी शिरले आहे. अवघ्या 4 तासात 100 मिमीपेक्षा अधिक पाऊस झाल्याची माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली. नागपूर जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त हे घटनास्थळी पोहोचले असून तातडीने आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात आहेत. सखल भागात अडकलेल्या नागरिकांना आधी तातडीने मदत करावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. एनडीआरएफची एक आणि एसडीआरएफच्या 2 चमू बचाव कार्यात तैनात करण्यात आल्या आहेत.
नागपूर महानगरपालिकेची महत्वाची सूचना: नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे की, नागपूर शहरात रात्रीपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे आवश्यक कामाशिवाय कुणीही घराबाहेर पडू नये. सततच्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी तसेच रस्त्यांवर पाणी जमा झाले आहे. नदी नाल्यांमध्ये पाणी वाढत असल्यामुळे पूल ओलांडू नये. पाणी कमी झाल्यानंतरच पूल ओलांडावा. अंबाझरी तलावाचे पाणी ओव्हरफ्लो झालेले आहे. त्यामुळे कुठल्याही अफवांकडे लक्ष देऊ नये. तलाव अथवा ओव्हरफ्लोकडे कुणीही जाण्याचा प्रयत्न करू नये. नागपूर महागरपालिकेचे अग्निशमन व आपत्कालीन सेवा पथक सातत्याने मदत व बचावकार्य करीत आहेत. कुठल्याही आपत्कालीन सेवेसाठी लगेच मनपाला 07122567029 किंवा 07122567777 या क्रमांकावर संपर्क साधा. अग्निशमन व आपत्कालीन सेवा पथक रात्रीपासून मदत व बचाव कार्यात असून पथकाला सहकार्य करा.

