आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:– एकदा मोबाइल हरवला की तो पुन्हा परत मिळण्याची आशाच अनेकजण सोडून देतात. एवढ्या लोकसंख्येत पोलीस तरी कसा शोध लावणार या निष्कर्षावर नागरिक येतात. पण, तंत्रज्ञान एवढे विकसित झाले की कुठलीही गोष्ट अशक्य नाही. ज्यांचे महागडे फोन हरविले किंवा चोरीला गेले आहेत, असे २८८ मोबाईल सायबर पोलिसांनी शोधले आहेत. तसेच पोलिस अधीक्षक नुरुल हसन, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव न्यायाधीश विवेक देशमुख, अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. सागर कवडे यांच्या हस्ते मुळमालकांना ते परत दिले.
नागरिकांनीही गणेशोत्सवात आम्हाला ‘बाप्पा’ पावला अशा प्रतिक्रिया देत पोलिसांचे आभार मानले. मोबाइल चोरीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून सायबर पोलिसांकडून तपास करुन २८८ मोबाईल शोधले. सर्व मोबाईल फोन त्यांच्या मूळ मालकांना वितरणाच्या कार्यक्रमाचे आयोजन शनिवारी पोलिस मुख्यालयातील आर्शिवाद सभागृहात करण्यात आले.
जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशन हद्दीत गहाळ झालेल्या मोबाईलच्या तक्रारीचे प्रमाण वाढले असून महागडे अँड्रॉइड मोबाइल गहाळ झाल्याने नागरिकांचा हिरमोड झाला होता. अशांना त्यांचे मोबाइल परत मिळवून कसे देता येतील याची योजना पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांनी आखली होती.
त्यानुसार सायबर सेल, सायबर पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी शोध मोहिमेत चालू वर्षात जिल्ह्यात हरविलेल्या मोबाइलपैकी २९ लाख ४७ हजार ७०० रुपयांचे २८८ मोबाईल हस्तगत केले. तसेच कार्यक्रमाला उपस्थित १५६ नागरिकांसह मूळ मालकांना परत करण्यात आले.

