विश्वनाथ जांभुळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन एटापल्ली:- भारत स्वतंत्र होऊन आज पंच्याहत्तर वर्षे झाली. देशात ‘अमृतमहोत्सव’ साजरा होत आहे. शहरांत झुलते पूल, मेगा प्रकल्प, मेट्रो रेल्वे, आणि स्मार्ट सिटी योजनेचे गोडवे गायले जात आहेत. पण गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील गोटाटोला नावाचं एक गाव आजही रस्त्याच्या प्रतीक्षेत आहे. स्वातंत्र्याचं अमृत त्यांच्यासाठी केवळ शब्दांतच आहे, प्रत्यक्षात मात्र चिखल, खड्डे, आणि अपमान.
गोटाटोला गाव सरखेडा ग्रामपंचायतीच्या हद्दीत येतं. पावसाळ्यात या गावाचा रस्ता अक्षरशः नाहीसा होतो. चिखल आणि दगडात बुडालेला मार्ग, खड्ड्यांनी भरलेली वाट, आणि निसरड्या मातीमधून चालणं म्हणजे दरवेळी जीवाची पर्वा न करता प्रयत्न करावा लागतो. आजारी व्यक्तीला दवाखान्यात नेणं हे धाडसाचं काम ठरतं. बाईला प्रसूती आली तरी ऍम्ब्युलन्स येत नाही. लोकांनी खाटेवरून, मोटरसायकलवरून किंवा कधी पायानेच अनेक किलोमीटर प्रवास करून रुग्णालय गाठले आहे.
या गंभीर समस्येची कल्पना प्रशासनाला आहे. पण दरवेळी फक्त आश्वासनंच मिळाली. आजवर शेकडो अर्ज, निवेदने, विनंत्या काहीही उपयोग झाला नाही. रस्त्याशिवाय गाव शून्य वाटतं. ना वाहतूक, ना आरोग्यसेवा, ना शिक्षण. गावात जणू सरकारी यंत्रणांनी पाठ फिरवलेली आहे.
“रुग्णवाहिका पोहोचत नाही; खाटेवर रुग्णांना जंगलातून दवाखान्यात नेण्याची वेळ” गोटाटोला गावात रस्ता नसल्याने पावसाळ्यात नागरिकांना जीवघेणा त्रास सहन करावा लागत आहे. पावसाच्या दिवसात चिखल आणि दलदल यामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प होते. अशा वेळी जर कोणी गंभीर आजारी झाला, तर रुग्णवाहिका पोहोचू शकत नाही. त्यामुळे गावकरी आपली कैफियेत शासन आणि प्रशासन समोर मांडण्यासाठी हे आंदोलन करत आहे.

