आरोग्य सेवेसाठी रुग्णांना तासन्तास प्रतीक्षा – रस्त्याची दुरवस्था आणि प्रशासनाच्या निष्काळजीपणाकडे बोट
मधुकर गोंगले, उपसंपादक
मो. नं. 9420751809.
*अहेरी==*
राजाराम :
राजाराम आरोग्य पथकासाठी शासनाकडून मंजूर झालेली रुग्णवाहिका सध्या कमलापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात वापरली जात असल्यामुळे राजाराम परिसरातील नागरिकांना तातडीच्या आरोग्य सेवेसाठी मोठा त्रास सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे, कमलापूरकडे स्वतःची रुग्णवाहिका असतानाही राजारामची रुग्णवाहिका तिथेच वापरली जात असल्यामुळे स्थानिक नागरिकांनी तीव्र असंतोष व्यक्त केला आहे.
राजाराम आरोग्य पथकाच्या हद्दीतील नागरिकांना जेव्हा आरोग्य सेवांची आवश्यकता भासते, तेव्हा त्यांना कमलापूर प्राथमिक आरोग्य केंद्रावर अवलंबून राहावे लागते. “कमलापूरची रुग्णवाहिका दुरुस्तीला गेली आहे” असे तोंडी उत्तर दिले जाते, मात्र यासंदर्भात कोणताही लेखी आदेश उपलब्ध नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे नागरिकांचा रोष आणखीनच वाढला आहे.
दरम्यान, राजाराम ते कमलापूर हे अंतर सुमारे १० ते १२ किलोमीटर असून, रस्त्याची अवस्था अत्यंत खराब आहे. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे रुग्णवाहिकेला हे अंतर कापण्यासाठी जवळपास एक तास वेळ लागतो. त्यामुळे अनेकदा गंभीर रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नाहीत आणि त्यांची स्थिती अधिकच गंभीर बनते. आपत्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिका मिळेपर्यंत राजाराम येथील रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना तणावाचा सामना करावा लागत आहे.
या गंभीर परिस्थितीमुळे राजाराम परिसरातील नागरिक संतप्त झाले आहेत. त्यांनी स्पष्ट मागणी केली आहे की – राजाराम आरोग्य पथकासाठी मंजूर झालेली रुग्णवाहिका मूळ ठिकाणी मुक्कामी ठेवण्यात यावी आणि आवश्यकतेनुसार इतरत्र पाठवावी.
या प्रश्नावर प्रशासन काय निर्णय घेते, याकडे आता संपूर्ण राजाराम व परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

