विश्वास त्रिभुवन, अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी
अहमदनगर:- कोरोना महामारीमध्ये कोविड प्रतिबंधात्मक उपाय योजना करीत असताना 2020 ते 2021 या कालावधीत महापालिकेचे 14 कर्मचारी मृत्युमुखी पडले होते. त्या कर्मचार्यांच्या वारसांना प्रत्येकी 50 लाख रुपयांची नुकसान भरपाई मिळणार आहे.
एकूण 19 कर्मचार्यांच्या प्रस्तावांपैकी 14 कर्मचार्यांना प्रस्तावाला शासनाने नुकतीच मंजुरी दिली आहे. यापूर्वी एका कर्मचार्याच्या वारसाला मदत मिळालेली आहे, अशी माहिती मनपा कामगार युनियनचे अध्यक्ष कॉ. अनंत लोखंडे, सरचिटणीस कॉ. आनंदराव वायकर यांनी दिली. प्रसिद्धी पत्रकात म्हटले, 2020-2021 मध्ये जगभरामध्ये कोरोना महामारीने थैमान घातलेले होते. या महामारीचा मुकाबला करण्याकामी अहमदनगर महानगरपालिकेमार्फत शासनाच्या आदेशानुसार कोरोना प्रतिबंधात्मक मोहीम राबविण्यात आली होती. या मोहिमेमध्ये महानगरपालिकेतील सर्व कर्मचारी कार्यरत होेते. कोरोना प्रतिबंधात्मक मोहिमेमध्ये कर्तव्य बजावित असताना एकूण 19 कर्मचारी कोरोना आजाराने मृत्युमुखी पडले होते. अहमदनगर महानगरपालिका कामगार युनियनने पंतप्रधान यांच्या गरीब कल्याण पॅकेजअंतर्गत त्या मृत 19 कर्मचार्यांचे वारसांना 50 लाख रुपयांची नुकसान भरपाई मिळण्याची मागणी महानगरपालिका प्रशासनाकडे केली. ते प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यास भाग पाडले. त्यासाठी आंदोलनही केले होते.
युनियनच्या वेळोवेळीच्या आंदोलनाच्या परिणामी अहमदनगर महानगरपालिका युनियनच्या मागणीनुसार आमदार संग्राम जगताप, महापौर रोहिणीताई शेंडगे, तत्कालीन आयुक्त शंकर गोरे, विद्यमान आयुक्त डॉ. पंकज जावळे, अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रदीप पठारे, उपायुक्त यशवंत डांगे यांनी वेळोवेळी शासनाकडे पाठपुरावा केला. यापूर्वी मयत 19 कर्मचार्यांपैकी केवळ 1 कर्मचार्याच्या वारसांना 50 लाखांची नुकसान भरपाई मिळाली होती. परंतु, उर्वरित 18 कर्मचार्यांचे वारसांना नुकसान भरपाई मिळणे गरजेचे असल्याने मनपा अधिकारी व महापालिका युनियन सतत पाठपुरावा करीत होती.
शासनाने 18 पैकी 14 कर्मचार्यांच्या वारसांना 50 लाख रुपये नुकसान भरपाई मिळण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. तो निधी संबंधित विभागाकडे अधिकृतपणे वर्ग केला आहे. उर्वरित चार कर्मचार्यांच्या वारसांना नुकसान भरपाईचे प्रस्ताव मंजुरी मिळण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे. यावेळी कामगार युनियनचे कार्यध्यक्ष गुलाब राजाराम गाडे, उपाध्यक्ष बाबासाहेब मुदगल, अय्युब शेख, सूर्यभान दैवघडे, जितेंद्र सारसर, बलराज गायकवाड, विठ्ठल उमाप, अकिल सय्यद, नंदुकुमार नेमाणे, राजेंद्र वाघमारे, राहुल साबळे, महादेव कोतकर, बाबासाहेब राशिनकर, बाळू व्यापारी, दत्ता फटांगरे, अमोल लहारे, राकेश गाडे, भास्कर आकुबत्तीन, सखाराम पवार, अनिल साठे आदी उपस्थित होते.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट ला www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

