✒️राज शिर्के, मुंबई (पवई) प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- मागील अनेक महिन्यांपासून महाराष्ट्रातील शेकडो नगरपालिका आणि नगर पंचायत मधील लोकप्रतिनिधींच्या कूर्ची खाली आहेत, त्यामुळे जनतेला मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. विकास कार्य ठप्प आहे. त्यामुळे निवडणूक कधी होतात याकडे सर्व राज्यातील नागरिकांचं लक्ष लागलं आहे. त्यावर माजी केंद्रीय मंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाष्य केले आहे.
महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी महत्त्वाचं भाकीत केलं आहे. मे महिन्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागू शकतात, असा सुतोवाच शरद पवार यांनी कार्यकर्त्यांच्या बैठकीत केला आहे. पुणे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी ही माहिती दिली आहे.
मे महिन्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागू शकतात त्यामुळे कार्यकर्त्यांनी आतापासूनच कामाला लागावं, असे आदेश शरद पवारांनी दिले आहे. शरद पवार आज पुण्यामध्ये होते. यावेळी त्यांनी तालुका निहाय बैठका घेतल्या.
राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे मिनी विधानसभा निवडणूक म्हणून पाहिलं जातं. पण प्रभाग रचना आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून निवडणुका वारंवार पुढे ढकलल्या जात आहेत. ओबीसी आरक्षणाचा मुद्दा सुप्रीम कोर्टात आहे, त्याच्या निर्णयानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा होईल.
ओबीसी आरक्षणाला सुप्रीम कोर्टाकडून हिरवा कंदील मिळाला तरी 92 नगरपरिषदांसाठी हा निर्णय लागू होणार नव्हता, त्यामुळे राज्य सरकारने या 92 नगरपरिषदांसाठीही ओबीसी आरक्षण लागू व्हावं, अशा मागणीची पुनर्विलोकन याचिका दाखल केली.
राज्यातल्या सर्व महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकींची प्रभाग रचना नव्याने होणार आहे. एकीकडे राज्य सरकारने नव्याने प्रभाग रचना करण्याचे आदेश दिले असतानाच दुसरीकडे ओबीसी आरक्षण आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधल्या प्रलंबित निवडणुका त्वरित घेण्याची विनंती करणारी याचिका सुप्रीम कोर्टासमोर आहे.

