✒️प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
मोबा नंबर :- 9284981757
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्ह्यात बोगस बियाण्यांची विक्री व शेतकऱ्यांची फसगत होऊ नये यासाठी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी आज वर्धा शहरातील काही कृषि केंद्राना अचानक भेटी दिल्या. या भेटीत त्यांनी बियाणे व खतांची विक्री व साठा तपासला.
यावेळी त्यांच्या सोबत अप्पर पोलिस अधिक्षक सागर कवडे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी प्रभाकर शिवणकर, कृषि विकास अधिकारी संजय बमनोटे, सेवाग्राम पोलिस स्टेशनचे ठाणेदार श्री.चकाते आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी यांनी अचानक भेट दिल्यानंतर त्यांनी केंद्रातील बियाणे साठा व विक्री यासह वेगवेगळ्या रजिस्टरची पाहणी केली. ज्या कृषी केंद्रांना जिल्हाधिका-यांनी भेट दिली त्या सर्वच कृषी केंद्रांमधील खत साठा व बियाणे साठा नोंदी बरोबर असल्याचे आढळून आल्याबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले.
यंदा कुठल्याही परिस्थितीत जिल्ह्यात बोगस बियाण्यांची विक्री होणार नाही याची दक्षता कृषी विभागासह कृषी केंद्र चालकांनी घ्यावी. खत व बियाण्यांची चढ्या दराने विक्री करणा-यासह बोगस बियाण्यांची विक्री करणा-यांवर कठोर कारवाई केली जाईल, असे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी स्पष्ट केले.
यावेळी बियाणे खरेदी करण्यासाठी आलेल्या शेतक-यांशी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी चर्चा करुन त्यांना बीबीएफ तंत्रज्ञानाचा वापर करण्याकरीता मार्गदर्शन केले तसेच चांगला पाऊन पडल्याशिवाय पेरणी करु नये असे सांगून जादा दराने कृषि केंद्र चालक बियाणे विक्री करीत असल्याचे आढळल्यास कृषि विभागास तक्रार करावी, असे जिल्हाधिकारी राहूल कर्डिले यांनी सांगितले.

