नितीन शिंदे, मुंबई महानगर प्रतिनिधी मोबा.न. 9892250402
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन ठाणे:- सन १९९७ साली ठाणे महानगरपालिका क्षेत्रात रस्त्याचे रूंदीकरण करीत असताना तात्कालीन आयुक्त टी. चंद्रशेखर यांनी समतानगर व लोकमान्यनगर पाडा नं. १ येथील काही भुखंडावर विस्थापितांचे पुर्न:वसन केले होते. तात्कालिन शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांच्या प्रयत्नाने सर्व विस्थापितांना ही जागा मिळाली होती. त्यावर सर्व रहिवाश्यांनी आपल्या आर्थिक कुवतीनुसार तळ अधिक एक मजल्याचे बांधकाम केले होते. तर समतानगर येथील राजीव गांधी नगर येथे काही विस्थापितांनी २ अथवा ३ मजल्याच्या इमारती बांधल्या होत्या. या बांधकामाला २४ वर्षांपेक्षा जास्त कालावधी झाला असल्याकारणाने ही सर्व घरे व इमारती धोकादायक झालेल्या आहेत.
काही वर्षांपूर्वी समतानगर येथील आनंदराम मधील विस्थापितांच्या वसाहतीमधील काही घरे पडली असता तात्कालिन आयुक्त संजीव जयस्वाल यांनी घटनास्थळी भेट देऊन या सर्व विस्थापितांना मालकी तत्वावर घरे मिळावीत या उद्देशाने वर्तकनगर येथील इमारत क्रं. ५४,५५,५६ या इमारतींची ज्या पध्दतीने पी.पी.पी. तत्वावर बांधणी झाली त्याच पध्दतीने या वसाहतींचे पुर्नवसन करण्यासंदर्भात महानगरपालिकेचे कार्यकारी अभियंता मोहन कलाल यांना जबाबदारी दिलेली होती. परंतू, आमदार प्रताप सरनाईक यांनी सर्व रहिवाश्यांसह मोहन कलाल यांच्याकडे पाठपुरावा करून सुध्दा अद्यापपर्यंत या प्रकल्पाला कुठलिही गती प्राप्त झालेली नाही.
चार महिन्यांपूर्वी विद्यमान आयुक्त अभिजित बांगर यांच्याबरोबर आमदार प्रताप सरनाईक यांनी भेट घेतली असता, आयुक्तांनी या संदर्भातील कार्यवाही करण्याचे आदेश मोहन कलाल यांना दिले होते. या घटनेला देखील चार महिने उलटूनही प्रकल्पाला गती प्राप्त झालेली नाही. याउलट दि. २७ जून, २०२३ रोजी दुपारच्या वेळेस या परिसरातील दोन चाळींचे सज्जे कोसळल्याची दुर्घटना घडली. सज्जे कोसळण्याची घटना जर सकाळच्या वेळेस घडली असती तर मोठी दुर्घटना होऊन जिवितहानी सुध्दा झाली असती, असे रहिवाश्यांचे म्हणणे आहे.
आमदार प्रताप सरनाईक यांनी दुर्घटना घडलेल्या वसाहतीस भेट देऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करून एमएमआरडीए चे आयुक्त संजय मुखर्जी यांच्याकडून एमएमआरडीए च्या मालकीच्या असलेल्या वर्तकनगर येथील आकृती हब टाऊन या इमारती मधील घरे तात्पुरत्या स्वरूपात या ४२ रहिवाश्यांसाठी घेतल्यामुळे सध्या तरी या रहिवाश्यांना तात्पुरत्या स्वरूपात निवारा मिळालेला आहे. परंतू, या सर्व रहिवाश्यांना कायम स्वरूपी घरे मिळण्यासाठी महानगर पालिकेने लवकरात लवकर हा प्रश्न निकाली काढावा व रहिवाश्यांना न्याय द्यावा. तसेच या प्रकल्पाच्या कामामध्ये हलगर्जीपणा करणार्या अधिकार्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आमदार प्रताप सरनाईक यांनी केली.
यावेळी समतानगर मधील राजीव गांधी नगर येथे भेट देताना अतिरिक्त आयुक्त संजय हिरवाडे, उपायुक्त मनोज जोशी, सहाय्यक आयुक्त सचिन बोरसे, कार्यकारी अभियंता मोहन कलाल उपस्थित होते.

